पुणे ः अतिवृष्टीमुळे राज्यातील १२ लाख हेक्टरपेक्षा जास्त पिकांची हानी झाली आहे. सर्वांत जास्त फटका मराठवाड्यातील उभ्या पिकांना बसला आहे. मात्र पीकपंचनामे अद्यापही सुरू असल्याने नुकसानग्रस्त क्षेत्राचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
‘‘राज्यात ऑगस्टपासून वेगवेगळ्या भागात अतिवृष्टी होत आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सव्वा दोन लाख हेक्टरमधील पिके पावसाच्या तडाख्यात आली होती. मात्र २७ सप्टेंबरअखेर नुकसान झालेल्या क्षेत्राचा आकडा १२ लाख ७८ हजार हेक्टरच्या पुढे गेलेला आहे. यानंतर गेल्या दोन दिवसांत गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीने मोठी पीकहानी घडवून आणल्याचा अंदाज आहे. मात्र ही हानी नेमकी किती याचा निश्चित अंदाज बुधवारी (ता. २९) दुपारपर्यंत आलेला नव्हता,’’ अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
कृषी विभागाकडून नजरपाहणीच्या आधारे पीकहानीचे आकडे निश्चित केले जातात. हेच आकडे पुढे राज्य शासनाला पाठविले जातात. अर्थात, कृषी, ग्रामविकास आणि महसूल विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष पंचनामे केल्यानंतर त्याआधारे मदत व पुनर्वसन विभागाला अहवाल पाठविला जातो आणि त्यानंतर प्रत्यक्ष मदत वाटप होते. सध्या मराठवाड्यात सतत पाऊस चालू आहे. काही तालुक्यांमध्ये कार्यालयाच्या बाहेर पडण्याची संधीदेखील कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे प्रत्यक्षात पंचनामेच झालेली नाहीत.
दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे. त्याविषयी येत्या आठवडाभरात निश्चित माहिती मिळण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
पावसामुळे हानी (हेक्टरमध्ये) | |
बीड | ४.६२ लाख |
नांदेड | २.७८ लाख |
औरंगाबाद | ९६ हजार |
परभणी | ८८ हजार |
नाशिक | ४४ हजार |
जळगाव | १९ हजार |
धुळे | १२ हजार |
अमरावती | २७ हजार |
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.