उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरूच

उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरूच
उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरूच

सिमला/धर्मशाला : उत्तर भारतात विशेषतः हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या राज्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. हिमाचलमध्ये पावसामुळे विविध दुर्घटनेत गेल्या चोवीस तासात १८ जण मृत्युमुखी पडले असून नऊ जण जखमी झाले आहेत. हिमाचलच्या अनेक जिल्ह्यात पूर आल्याने असंख्य गावांचा संपर्क तुटला आहे. दरड कोसळणे आणि भुस्खलनामुळे ३२३ रस्ते आणि राष्ट्रीय महामार्ग ५ वरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. हिमाचलशिवाय उत्तराखंड, राजस्थान, पंजाबच्या अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हिमाचलमध्ये विविध कारणामुळे १८ जणांचा मृत्यू झाला आणि नऊ जण जखमी झाले आहेत. सिमला येथे ८, कुलू आणि सिरमौर, सोलन आणि चंबा येथे प्रत्येकी दोन आणि उना व लाहोल स्पिटी जिल्ह्यात प्रत्येकी एक जण मृत्युमुखी पडले आहेत. सिमल्याजवळ आरटीओ कार्यालयाजवळ भूस्खलनच्या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला. याशिवाय अन्य एका घटनेत एका व्यक्तीचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तसेच भिंत कोसळून एका मजुराचा मृत्यू झाला. याशिवाय कुलू जिल्ह्यात रोहरु येथे भुस्खलनामुळे एकाचा मृत्यू झाला. पावसामुळे झाड कोसळून २ नेपाळी नागरिकांचा मृत्यू झाला. त्याचवेळी चंबा येथे पुरात एक जण वाहून गेला. विविध घटनांमुळे राज्यातील ३२३ रस्ते बंद करण्यात आले आहेत. धर्मशाळा येथे ११४ मिलिमीटर, डलहौसी आणि चंबा येथे ७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. लाहौल स्पिटी जिल्ह्यात मनालीकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर कोकसर येथे पुलाची हानी झाल्याने वाहतूक थांबविली आहे. याशिवाय मनाली-लेह मार्गावर भूस्खलन झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

पंजाबमध्ये छत कोसळून तीन ठार पंजाबमध्ये अनेक भागात पाऊस सुरू असल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पंजाबच्या खन्ना शहरातील ओल गावात घराचे छत कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. सुरजित सिंग, त्यांची पत्नी बालजिंदर कौर आणि मुलगा गुरप्रित सिंग अशी मृतांची नावे आहेत. सुदैवाने दहा वर्षाची मुलगी या दुर्घटनेतून बचावली. दरम्यान, गुरुदासपूर जिल्ह्यात बियास नदीला आलेल्या पुरातून सुमारे ११ जणांना वाचविण्यात यश आले. बियास नदीच्या काठावर असलेले चाचैन शोरियान गावातील नागरिक वाहून गेल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यानुसार मोहीम राबवत अकरा जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.रावी आणि बियास नदीला सध्या पूर आला असून सखल भागात जाणे नागरिकांनी टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.  उत्तरकाशीत ढगफुटी; पाच बेपत्ता हिमाचल प्रदेशाव्यतिरिक्त उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे अनेक गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हालविण्यात आले आहे. उत्तरकाशीत पावसामुळे घरांची पडझड झाली आहे. पाणी पातळी वाढल्याने एसडीआरएफ,रेड क्रॉस, आयटीबीपी आणि एनडीआरएफचे पथके तैनात केली आहेत. पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हालविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मोरी तहसीलतंर्गत ढगफुटी झाल्याने टोन्स नदीला पूर आला आहे. तसेच वीस घरे वाहून गेली आहेत. पावसामुळे पाच जण बेपत्ता झाले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com