सोलापूर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ

सोलापूर :जिल्ह्यात पंढरपूर, माळशिरस, सांगोला, मंगळवेढा, बार्शी आदी तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
Heavy rains in Solapur district
Heavy rains in Solapur district

सोलापूर : जिल्ह्यात सलग पाचव्यादिवशी पावसाने दमदार हजेरी लावली. मंगळवारी (ता.१३) रात्री सुरु झालेला मुसळधार पाऊस बुधवारी दुपारपर्यंत कोसळतच राहिला. यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच सलग दीड दिवस पाऊस झाला. जिल्ह्यात पंढरपूर, माळशिरस, सांगोला, मंगळवेढा, बार्शी आदी तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. 

दरम्यान, जिल्ह्यात येत्या शनिवारपर्यंत (ता.१७) अतिवृष्टी होण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. चार दिवसांपासूनच्या सततच्या पावसाने काढणी झालेल्या सोयाबीन, मूग, उडदाचे नुकसान झालेच. ऊस, कांदा, डाळिंब, द्राक्ष या पिकांनाही त्याचा मोठा फटका बसला आहे. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास पावसाने सुरवात केली. रात्रभर रिपरिप सुरुच राहिली.

पहाटे साडेतीनच्या सुमारास पावसाने मुसळधार सुरवात केली. बुधवारी (ता.१४) दुपारपर्यंत त्याची ही मुसळधार सुरुच होती. या पावसामुळे पंढरपूर, अक्कलकोट, मोहोळ, सांगोला भागात शेतांची तळी झाली, बार्शी, उत्तर सोलापूर, मोहोळ तालुक्यात कांद्याच्या नवीन लागणी विरघळून गेल्या, तर लागवड झालेला कांदा पाण्यात बुडाला. 

सांगोल्यात आधीच डाळिंबाची फूलगळ, फळगळती होत आहे. त्यात आता पुन्हा ही समस्या वाढणार आहे. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, पंढरपूर या भागात सध्या द्राक्षाच्या छाटण्या सुरु आहेत. पण पावसामुळे त्यात आता व्यत्यय आला आहे. पंढरपूर, माढा, करमाळा, मोहोळ भागात अनेक ठिकाणी ऊस आडवा झाला आहे. आधीच चार दिवसांपासून सतत पाऊस सुरु आहे. त्यामुळे सततचा पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा मोठा फटका जिल्ह्यातील शेतीला बसला आहे.

अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदीला पूर आला आहे. त्यामुळे अक्कलकोट-गाणगापूर वाहतूक ठप्प झाली आहे. वैराग ते उस्मानाबाद मार्गही मालेगावनजीक पाण्यामुळे बंद पडला आहे. 

जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

जिल्ह्यात येत्या शनिवारपर्यंत (ता.१७) अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, अतिवृष्टी झाल्यास नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्हा आणि शहर आपत्ती व्यवस्थापन विभागांनी याबाबत दक्षता घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी दिले आहेत.

जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी शोध आणि बचाव पथके; तसेच साहित्य यांची व्यवस्था करावी, आपत्ती व्यवस्थापन विभागांनी सर्व कर्मचारी उपलब्ध ठेवावेत, दुर्घटना घडल्यास तातडीने बचाव कार्य करावे, जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारती आणि पूल या ठिकाणची वाहतूक वळवावी किंवा तात्पुरती थांबविण्यात यावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी ०२१७-२७३१०१२ किंवा १०७७ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहनही निवासी उपजिल्हाधिकारी देशमुख यांनी केले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com