कोकणातील बागायतदारांना विशेष निकषांतर्गत मदत द्यावी ः फडणवीस

शेतकऱ्याला पुढील वर्षभर किंवा स्वतःला उभे राहता येईल एवढी भरपाई दिली पाहिजे, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
Help should be given to the farmers in Konkan under special criteria: Fadnavis
Help should be given to the farmers in Konkan under special criteria: Fadnavis

रत्नागिरी ः तौत्के चक्रीवादळात वाड्या, वस्त्या उन्मळून पडल्या आहेत. आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. झाडांवरील आंब्याची प्रचंड हवेमुळे फळगळ झाली आहे. मात्र, मदत देताना झाडाला पाचशे रुपये मिळतात. या परिस्थितीत विशेष निकष लावले पाहिजेत. शंभर टक्के देऊ शकत नसला तरीही शेतकऱ्याला पुढील वर्षभर किंवा स्वतःला उभे राहता येईल एवढी भरपाई दिली पाहिजे, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

तौत्के वादळात नुकसान झालेल्या लोकांशी विरोधी पक्षनेते श्री. फडणवीस यांनी संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

फडणवीस म्हणाले की, कोकणात गतवर्षी निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झाले. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड दौरा केला. तसेच मदत देण्याची घोषणा केली. त्यावेळीच्या नुकसानीसाठी दिडशे कोटी रुपये आले. त्याचे वाटप सुरू आहे. मात्र, हा निधी अपुरा होता. त्यावेळी खूप मोठ्या घोषणा केल्या. प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना हात आकडता घेतला. त्यामुळे त्या घोषणा पोकळच ठरल्या. कोकणाने शिवसेनेला भरपूर दिले. निसर्ग असो किंवा तौत्के वादळ आता कोकणवासीयांना देण्याची वेळ आली आहे. मात्र, सरकार कुठेतरी हात आखडता घेत आहे. केंद्राकडे बोट दाखवून वेळ मारुन नेत आहे. अनेक जणं पाचशे-पाचशे कोटी रुपयांचा निधी आपल्या मतदारसंघात नेत आहे. या स्थितीत कोकणाला दोनशे कोटी द्यायला कारणे दाखवली जातात, असा आरोप त्यांनी केला.

आपत्कालीन स्थितीमध्ये तातडीची मदत द्यायला सुरू केली पाहिजे होते. त्याला फार लागत काही नाही. केंद्र शासन आपत्कालीन परिस्थितीसाठी एसडीआरएफमधून निधी देत असते. तो राज्य शासनाने वर्षभर खर्च करावयाचा असतो. तो संपला की पुन्हा मागणी करायची असते. त्या निधीमधून मदत केली तर त्याचा निश्‍चितच फायदा लोकांना होईल, असे फडणवीस म्हणाले.  

दौऱ्याच्या घोषणेनंतर सरकारच्या हालचाली या परिस्थितीमध्ये लोकांच्या पाठीशी उभे राहीले पाहिजे. आमच्या दौऱ्याची घोषणा झाल्यानंतर सरकारला जाग आली आहे. आम्ही आलो की प्रशासन सजग होते. मात्र, कोकणात नेते राजकारणासाठी येतात, तसे मदतीसाठीही या असा टोला श्री. फडणवीस यांनी सरकारला हाणला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com