पीक, पाण्याविना जगायचं कसं? शेतकऱ्यांची व्यथा

पीक, पाण्याविना जगायचं कसं? शेतकऱ्यांची व्यथा
पीक, पाण्याविना जगायचं कसं? शेतकऱ्यांची व्यथा

मालेगाव, जि. नाशिक : ‘पेरलं ते वाया गेलं. दुबार पेरणीही हाती लागली नाही. आता ना चारा, पीक ना पाणी. जगायचं कसं हा प्रश्‍न हाय. त्यात जर वीजबिल आणि कर्जवसुलीसाठी बँकवाले दारात आले, तर शेतकरी आत्महत्या करतील'', अशा शब्दांत मेहणेतील (ता. मालेगाव) शेतकऱ्यांनी दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर आपली व्यथा मांडली. ‘साहेब बँकेचं कर्ज काढून शेतात कांद्याची लागवड केली. मात्र, पाऊस नसल्यानं विहिरीला पाणी उतरलं नाही. कांदे जगवण्यासाठी शेतात ११ बोअरवेल मारले, पण एकालाही पाणी लागलं नाही. शेवटी पाच एकर कांदा जळून खाक झाला. आता बँकेकडून घेतलेलं कर्ज फेडू कसं? घरचा उदरनिर्वाह करायचा कसा? या चिंतेने रात्रीच्या वेळी झोप लागत नाही. शेतकऱ्यांनी करायचे तरी काय`?, असा दुष्काळाचा दाहक अनुभव हरनूल (ता. चांदवड) येथील वैजयंती भोसले या शेतकरी महिलेने पथकाला सांगितला.

छावी झा, आर. डी. देशपांडे, ए. के. तिवारी आणि डॉ. शालिनी सक्सेना या केंद्रीय पथकातील सदस्यांनी मालेगाव तालुक्यातील मेहणे, तर चांदवडमधील हरनुल, हरसूल परिसरात दुष्काळी पाहणी केली. या वेळी शेतकऱ्यांच्या व्यथा एकूण पथकातील सदस्यांना गहिवरून आले. केंद्रीय पथकाने मेहुणे गावाला दुपारच्या सुमारास भेट दिली. शिवाजी देवरे या शेतकऱ्याने शोभाबाई देवरे यांच्या शेतातील जळालेला भुईमूग दाखवला. सहा लाखांचे कर्ज डोक्यावर आहे, ते कसे फेडणार असा सवाल केला. त्यावर पथकाने पीकविमा काढला नाही का, असा प्रतिप्रश्‍न केला. गेल्या तीन-चार वर्षांत एकाही शेतकऱ्याला विम्याचा लाभ झाला नसल्याचे सांगितले.

मेहणेनंतर पथकाने वऱ्हाणे शिवार, जळगाव निंबायती शिवारातील स्थिती पाहिली. दरम्यान मेहुणे गावात पाण्याचा टँकर आला. त्याची कळ सोडताच गावकऱ्यांची पाण्यासाठी झुंबड उडाली. पथकाने महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. या वेळी विभागीय महसूल आयुक्त राजामाने माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती मनीषा पवार, तहसीलदार ज्योती देवरे, गटविकास अधिकारी आनंद पिंगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विनोद शेलार आदी उपस्थित होते.

‘साहेब कर्ज कसं फेडू` केंद्रीय पथक सांयकाळी चांदवड तालुक्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी दाखल झाले. तालुक्यातील हरनूल, हरसूल येथील शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याअभावी जळालेले कांदा, टोमॅटो पिकांच्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली. शेतकऱ्याच्या व्यथा ऐकूण घेतल्या. या वेळी कांदा जळाल्याने कर्जबाजारी झालेल्या वैजयंती भोसले यांना पथकासमोर व्यथा सांगताना अश्रू अनावर झाले. हरसूल येथील नामदेव त्र्यंबक रौंदळ यांच्या शेतात लागवड केलेल्या मका, टोमटो, कांद्याची पाहणी पथकाने केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com