अचूक हवामान अंदाजामुळे जीवितहानीत घट : संशोधन अहवाल

गेल्या पन्नास वर्षांमध्ये देशात हवामान विभागाने तंत्रज्ञानाच्या आधारे अचूक हवामानाचे अंदाज देण्यावर भर दिला आहे. देशभरात तिव्र हवामानाच्या घटनांमुळे होणारी जिवितहानीमध्ये जवळपास ४८ टक्क्यांनी घट झाली आहे.
अचूक हवामान अंदाजामुळे जीवितहानीत घट : संशोधन अहवाल
अचूक हवामान अंदाजामुळे जीवितहानीत घट : संशोधन अहवाल

पुणे : गेल्या पन्नास वर्षांमध्ये देशात हवामान विभागाने तंत्रज्ञानाच्या आधारे अचूक हवामानाचे अंदाज देण्यावर भर दिला आहे. देशभरात तिव्र हवामानाच्या घटनांमुळे होणारी जिवितहानीमध्ये जवळपास ४८ टक्क्यांनी घट झाली आहे. हवामान अंदाज आणि आपत्ती व्यवस्थापनात झालेल्या सुधारणांमुळे हजारो नागरिकांचे प्राण वाचले असल्याचा निष्कर्ष नुकत्याच झालेल्या संशोधनातून काढण्यात आला आहे.  भारतात गेल्या पाच दशकांत हवामानाच्या तीव्र घटनांमुळे झालेल्या जीवितहानीच्या संशोधनाचा आढावा नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘वेदर अॅंड क्लायमेट एक्स्ट्रीम्स’ या जर्नलमध्ये घेण्यात आला आहे. यामध्ये महालनोबिस नॅशनल क्रॉप फोरकास्ट सेंटरचे एस.एस.रे, भूविज्ञान मंत्रालयाचे कमलजित रे, एम. राजीवन, भारतीय हवामान हवामानशास्त्र विभागाचे आर. के. गिरी आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे ए.पी. डिमरी या शास्त्रज्ञांचा या संशोधनात सहभाग आहे.  संशोधनातील आकडेवारीनुसार १९७० ते २०१९ या कालावधीत देशभरात एकूण सात हजार ६३ हवामानाच्या तीव्र घटना नोंदविल्या गेल्या. यामध्ये अतिवृष्टी आणि पूर, चक्रीवादळे, उष्णतेची लाट, थंडीची लाट, विजा पडणे अशा घटनांचा समावेश होता. या घटनांमुळे पाच दशकांत देशभरात एकूण एक लाख ४१ हजार ३०८ व्यक्तींचा मृत्यू झाला. मात्र, १९७० ते १९९९ आणि २००० ते २०१९ या दोन दशकातील तुलना केल्यास पहिल्या दोन दशकांच्या तुलनेत नंतरच्या दोन दशकांत तीव्र हवामानाच्या घटनांत वाढ होऊनही जीवितहानी कमी झाल्याचे दिसून आले आहे.  गेल्या दोन दशकांत आधीच्या दोन दशकांच्या तुलनेत तीव्र हवामानाच्या घटनांमुळे होणारी जीवितहानी ४८.६ टक्क्यांनी कमी झाली आहे. चक्रीवादळ आणि पूर यामुळे होणाऱ्या जीवितहानीत तब्बल ७५ टक्यांनी घट झाल्याचे संशोधनाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. अचूक हवामान अंदाज आणि त्याला अनुसरून स्थानिक पातळीवर वेळेत केलेल्या आपत्ती नियोजनामुळे हे शक्य झाले असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. याशिवाय राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर गेल्या दोन दशकांत उष्णतेची लाट आणि विजा पडून होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे संबंधित राज्यांनी परिस्थितीनुसार आपत्ती नियोजन करण्यावर अधिक भर देण्याची गरज असल्याचे माहितीही भारतीय हवामान हवामानशास्त्र विभागाचे आर. के. गिरी दिली.  गेल्या १९७० ते २०१९ या काळातील जीवितहानीचे प्रमाण 

घटना घटना मृत्यू प्रमाण 
उष्णतेची लाट ७०६ १७३६२ १२.३ 
थंडीची लाट ५४६ ९.५९६ ६.८ 
पूर ३,१७५ ६५,१३० ४६.१ 
विजा पडणे २,५१७ ८,८६२ ६.३ 
चक्रीवादळे ११७ ४०,३५८ २८.६ 

घटनेनुसार सर्वाधिक प्रभावित झालेली पहिली पाच राज्ये :  थंडीची लाट ः बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, राजस्थान  उष्णतेची लाट ः आंध्र प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा  पूर ः उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, उत्तरांखड, आंध्र प्रदेश, बिहार  विजा पडणे ः महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगाल, कर्नाटक, मध्य प्रदेश  चक्रीवादळ ः ओडिशा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात तमिळनाडू 

प्रतिक्रिया हवामानाच्या अचूक अंदाजामध्ये निश्चितच सुधारणा झाल्या आहेत. अचूक अंदाजामुळे जीवितहानीच्या नुकसानीची पातळी कमी झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने नव्याने यंत्रसामग्रीत वाढ करून तसेच नवीन प्रारूपे तयार करून हवामान अंदाजाची अचूकता वाढलेली आहे.  - डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ कृषी हवामानशास्त्रज्ञ, सदस्य, अॅग्रीकल्चर मेट्रोलॉजी फोरम फॉर साऊथ आशिया. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com