पुणे : अंदमान समुद्रात ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. या क्षेत्राची तीव्रता वाढून आज (ता. ३) बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ घोंघावणार आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर आल्यानंतर ही वादळी प्रणाली ईशान्य दिशेला पश्चिम बंगालकडे सरकण्याचे संकेत आहेत. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रात फारसा प्रभाव जाणवणार नसून, राज्याला धोका नसल्याचे हवामान तज्ज्ञांनी म्हटले आहे.
थायलंडच्या किनाऱ्यालगत तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे अंदमान समुद्रात कमी दाब क्षेत्र तयार झाले. हे कमी दाबाचे क्षेत्र वायव्य दिशेला भारताच्या किनाऱ्याकडे सरकताना त्याची तीव्रता वाढत आहे.
आज (ता. ३) बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. शुक्रवारी (ता. ४) ही चक्रीवादळ प्रणाली उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्याजवळ पोहोचणार आहे. पूर्व किनाऱ्यावर येताच वादळी प्रणालीची दिशा बदलून ते ईशान्य पश्चिम बंगालकडे जाण्याचे संकेत आहेत. पूर्व किनारपट्टी वगळता पूर्व आणि मध्य भारतातील राज्यात वादळाचा फारसा प्रभाव जाणवणार नाही.
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होत आहे. हे चक्रीवादळ उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्याकडे येणार आहे. किनाऱ्यावर पोहोचताच ही प्रणाली समुद्रातून ईशान्य दिशेकडे सरकणार आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कोणताही वातावरणीय प्रभाव जाणवणार नाही. - माणिकराव खुळे, निवृत्त, हवामान तज्ज्ञ, भारतीय हवामान खाते, पुणे
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.