नगर ः केंद्र सरकारने शेतीमालाचा ५० टक्के नफा गृहीत धरून हमीभाव द्यावा. हमीभावानुसार सरकारनेच शेतीमाल खरेदी करावा, असा बदल केंद्र सरकारने त्यांच्या कृषी कायद्यांत केला, तर मी भाजपमध्ये जाईन, त्यांची सेवा करीन, असा उपरोधिक टोला जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केंद्र सरकारला लगावला. बिहार निवडणुकीचा महाराष्ट्रावर काहीही परिणाम होणार नाही, असे ही त्यांना स्पष्ट केले.
नगर येथे जलसंपदा कार्यालयात दिव्यांगांसाठी सुरू केलेल्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मंत्री कडू यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
श्री. कडू म्हणाले, की केंद्र सरकारने केलेला कृषी कायदा राज्य सरकारने नाकारला आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसंदर्भात कोणताही कायदा करताना, आमच्या संघटनेने शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या दोन मागण्या त्यात घ्याव्यात. शेतीमालाचा ५० टक्के नफा गृहीत धरून हमीभाव द्यावा. हमीभावानुसार सरकारनेच शेतीमाल खरेदी करावा, अशी मागणी होती आणि आहे. मात्र केंद्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. जर केंद्र सरकारने हमीभावानुसार सरकारनेच शेतीमाल खरेदी करावा, असा बदल केंद्र सरकारने त्यांच्या कृषी विधेयकांत केला, तर मी भाजपमध्ये जाईन, त्यांची सेवा करीन, बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने जेवढी वातावरणनिर्मिती केली, त्या प्रमाणात त्यांना विजय मिळाला नाही. या निवडणूक निकालाचे महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही पडसाद उमटणार नाहीत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे. राजकारणात चढ-उतार सुरूच असतात. बिहार निवडणुकीत त्याचा अनुभव आल्याचे मंत्री कडू यांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.