गडचिरोली : 'आयसीएआर'ची काजू पीक लागवडीची चाचपणी

'आयसीएआर'ची काजू पीक लागवडीची चाचपणी
'आयसीएआर'ची काजू पीक लागवडीची चाचपणी

गडचिरोली  ः भात उत्पादक पूर्व विदर्भात आर्थिक समृद्धी यावी याकरिता अपारंपरिक पिकाच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) घेतला आहे. त्या अंतर्गत काजू लागवडीची चाचपणी या भागात केली जात असून त्या पार्श्‍वभूमीवर अकोला कृषी विद्यापीठाच्या पथकाने गडचिरोली जिल्ह्यातील पारंपरिक काजू क्षेत्र असलेल्या रोपवाटिकांची पाहणी केली.  पूर्व विदर्भातील अमरावती नागपूर जिल्ह्यात संत्रा हे फळपीक होते. राज्यातील सरासरी दीड लाख हेक्‍टर क्षेत्रापैकी सुमारे एक लाख हेक्‍टर क्षेत्र नागपुरी संत्र्याखाली विदर्भात आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यात धाना(भाता)खालील सर्वाधिक क्षेत्र आहे. परंतू अनेक कारणांमुळे धान पिकाची अपेक्षित उत्पादकता मिळत नसल्याने या भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान बदलले नाही. त्या पार्श्‍वभूमीवर नवीन पिकांचा पर्याय शेतकऱ्यांना देण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत असलेल्या गोव्यातील कोस्टल रिसर्च सेंटरच्या वतीने देशातील विविध भागासाठी पर्यायी पीक कार्यशाळा भरविण्यात आली. त्यामध्ये पूर्व विदर्भात काजू लागवड शक्‍य असल्याचा दावा करण्यात आला. या कार्यशाळेला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश नागरे, फळपीकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. शशांक भराड उपस्थित होते. कार्यशाळेरून परतल्यावर त्यांनी गडचिरोलीतील वाकोडी येथील कृषी विभागाच्या रोपवाटिकेला भेट दिली. या ठिकाणी ३५० काजूची झाडे असून ती १० वर्ष जुनी आहेत. काजूची झाडे चांगल्या स्थितीत असल्याने या भागातील वातावरण पोषक असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांनी काढला. केव्हीकेचे डॉ. संदीप कऱ्हाळे, सह्योगी अधिष्ठाता डॉ. एस. बी. अमरशेट्टीवार, डॉ. शालिनी बडगे, सहायक गीता कुळमेथे आदी या वेळी उपस्थित होते.  भारतीय कृषी संशोधन परिषद तसेच दापोली कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ या भागाचा दौरा करणार आहेत. विद्यापीठ करणार संशोधन पूर्व विदर्भात काजू लागवड शक्‍य असली तरी वातावरणातील बदलामुळे होणारी फळगळ नियंत्रणाचे आव्हान पहिल्या टप्प्यात तज्ज्ञांसमोर असणार आहे. वेंगुर्ला ४ व ६ हे काजू वाण आहेत. परंतू या भागासाठी कमी कालावधीत परिपक्‍व होणारे वाण देणे. तापमान वाढते त्यामुळे फळगळीची शक्‍यता, १४ ते १५ अंश सेल्सीअस तापमान राहावे याकरिता मायक्रो क्‍लायमेटची निर्मिती करावी लागणार आहे. त्या माध्यमातून पाणी, आर्दता आणि तापमान नियंत्रीत ठेवावे लागेल. जागेवर खुंटाची वाढ करून त्यावर कलम बांधावी लागेल, त्या दृष्टीने तज्ज्ञांकडून चाचपणी करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com