वाकोद, जि. जळगाव : ‘‘कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी अजूनही कापूस पिकामध्ये व्यवस्थापन केल्यास चांगले उत्पादन मिळणे शक्य आहे,’’ असे मत वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. बी. डी. जडे यांनी व्यक्त केले. वाकोद (ता. जामनेर) येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस परिसंवादात जडे यांनी मार्गदर्शन केले.
जडे म्हणाले, ‘‘सातत्याने झालेल्या पावसामुळे कापूस पिकामध्ये पात्या, फुले गळ व बोंड सड झाली आहे. यामुळे उत्पादनात घट येईल. पण अशातही शेतकऱ्यांनी वेळ न घालविता काही बाबींवर काम करावे. सततच्या पावसामुळे जमिनीतील अन्नद्रव्ये झिरपून गेली आहेत. कापूस पिकाला पोषणाची गरज आहे. ज्यांच्या कापूस पिकात ठिबक सिंचन आहे, त्यांनी युरिया, १२:६१:० आणि पांढरा पोटॅश एकत्रित ड्रीपमधून देणे गरजेचे आहे. सोबत मॅग्नेशिअम सल्फेट आणि चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये आठवड्यातून एक वेळा द्यावी. ठिबक नसलेल्यांनी एकरी १०:२६:२६ रासायनिक खताची १ बॅग, युरिया १ बॅग द्यावा. खते मातीने झाकून द्यावीत. १३:४०:१३ ची फवारणी करावी.’’
‘‘गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा. शेतात एकरी ५ कामगंध सापळे लावावेत. निंबोळी अर्काची फवारणी करावी. नंतर एका आठवड्याने प्रोफेनोफॉस किंवा थायोडीकार्बची फवारणी करावी. रस शोषण करणारी कीड, मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी यांच्या नियंत्रणासाठी पिवळे, निळे चिकट सापळे लावावेत. आंतरप्रवाही कीटकनाशकांची फवारणी करावी. यामुळे पुढे कापसाचे उत्पादन चांगले मिळेल,’’ असेही जडे यांनी सांगितले.
‘‘शेतकऱ्यांनी जानेवारी अखेरपर्यंत कापूस पीक संपवावे. त्याचे कोणतेही अवशेष शेतात राहणार नाही, याची काळजी घ्यावी’’, असे डॉ. जडे म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष धोंडूराव वानखेडे, विनोद राजपूत, मंगेश देशमुख, मनोज पाटील, मोहन देशमुख, भास्कर पाटील, उपसरपंच भगत प्रकाश जैन, रमेश आस्कर, राहुल आस्कर, डॉ. संतोष चौधरी, संजय सपकाळे, होळे आदी भागांतील शेतकरी उपस्थित होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.