नुकसानभरपाईपोटी मिळणार सरसकट मदत ः डॉ. बोंडे

नुकसानभरपाईपोटी मिळणार सरसकट मदत ः डॉ. बोंडे
नुकसानभरपाईपोटी मिळणार सरसकट मदत ः डॉ. बोंडे

अमरावती  : मॉन्सूनोत्तर पावसामुळे राज्यात सगळीकडेच शेतीचे व शेतीपिकाचे नुकसान झाले आहे. पश्चिम विदर्भातसुद्धा नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक वाया गेले आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण १ हजार ९८९ गावांपैकी १ हजार ६०६ बाधित गावांची संख्या आहे. दरम्यान, शेतपिकांच्या नुकसानभरपाईपोटी सरसकट मदत मिळवून देणार असल्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी मंगळवारी (ता. ५) सांगितले. या अनुषंगाने येत्या गुरुवारपर्यंत जिल्ह्यातील बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करून पंचनामे पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी आज आमदार बच्चू कडू, आमदार रमेश बुंदीले, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांच्यासह जिल्ह्यातील मोर्शी, चांदूर बाजार, दर्यापूर व भातकुली तालुक्यांतील नुकसानग्रस्त शेतपिकांची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत नुकसानीसंदर्भात कृषिमंत्र्यांनी आढावा घेतला, त्या वेळी ते बोलत होते. बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांचेसह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आदी उपस्थित होते.

डॉ. बोंडे यांनी मोर्शी तालुक्यातील काटसूर, चांदुरबाजार तालुक्यांतील मौजा टाकरखेडा परिसरातील शेती, अचलपूर तालुक्यातील मौजा आसेगाव पूर्णा, दर्यापूर तालुक्यातील मौजा येसुर्णा, चंडीकापूर, खल्लार परिसरातील शेती, भातकुली आदी तालुक्यांतील बाधित शेतीला प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानग्रस्त शेतीपिकांची पाहणी केली. मॉन्सूनोत्तर पावसामुळे सोयाबीन, कपाशी, ज्वारी तसेच मूग व उडीद या खरीप पिकांचे आणि केळी, संत्रा या फळपिकांचे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. सोयाबीन पूर्णत: खराब झाले असून त्याला कोंब आलेले दिसले तर कपाशीची बोंड खराब झाल्याचे दिसून आले आहेत. पाहणी दरम्यान सर्वत्र नुकसान झाल्याचे आढळून आले. येत्या गुरुवारपर्यंत नुकसानग्रस्त भागांचे तातडीने सर्वेक्षण करून पंचनामे तयार करण्याचे आदेश कृषिमंत्र्यांनी या वेळी संबंधित यंत्रणांना दिले.  या वेळी डॉ. बोंडे म्हणाले, की जिल्ह्यात जवळपास साठ टक्के शेतकऱ्यांनी पीकविमा काढल्याचे दिसून येते. पीकविमा काढलेल्या तसेच न काढलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याची रक्कम किंवा नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी शासनाने समन्वयाची भूमिका घ्यावी. कृषी विभागाने सक्रियपणे काम करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून क्लेम फॉर्म भरून घ्यावे. भरपाईसाठी विम्याची रक्कम भरल्याचा कुठलाही पुरावा ग्राह्य धरण्यात येईल. कृषी विभागाने विम्याची रक्कम मिळण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करून शेतकऱ्यांना सहाय्य करावे. सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी शासन सर्वकष मदत करणार. कोणत्याही शेतकऱ्यांनी हतबल होऊ नये, शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले. पाहणी दरम्यान येसुर्णा येथील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.  दरम्यान, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी कृषी विभागाच्या अधिनस्त काम करणारे कृषी सहायक, कृषी मित्र तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी गावागावात मार्गदर्शन व जनजागृती करावी. कृषी विभागानी शेतकऱ्यांचे पीकविमा व नुकसानभरपाईचे अर्ज संबधित विमा कंपनीला पाठवावे. गावागावात दवंडी देऊन तसेच व्हॉटस्ॲप मॅसेज तसेच प्रसारमाध्यमांतून आवाहन करून नुकसानभरपाई संदर्भातील संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात जनजागृती करावी. पीकविम्याची मदत मिळण्यासाठी शासकीय यंत्रणेने समन्वयाने कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com