वऱ्हाडात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

वऱ्हाडात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या
वऱ्हाडात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

अकोला  ः या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने संपूर्ण खरीप हंगाम अडचणीत आला. सोयाबीन, कापूस, ज्वारी, मका अशा विविध पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शासनाने तातडीने या भागात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विविध संस्था, संघटनांकडून शासनाकडे करण्यात आली आहे.       ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी धरणे अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पिकांचे नुकसान झाल्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. मॉन्सूनोत्तर पावसाने शेतातली मूग, उडीद, ज्वारी, सोयाबीन व कापूस पिकाचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतात पाणी साचलेले असल्यामुळे रब्बीचे पीकसुद्धा लागवड करता आलेले नाही. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती देऊन रब्बी हंगामाकरिता कर्जवाटप करावे, शेतकऱ्यांना खरिपात झालेल्या पीक नुकसानीकरिता एकरी २५ हजार रुपये अनुदान देण्यात यावे, शेतकऱ्यांकडून विमा कंपनीने कोणत्याही प्रकारचे कागदपत्र न घेता नुकसानभरपाई द्यावी, कृषी पंपावरील वीजबिल माफ करून रब्बी व उन्हाळी हंगामांत मोफत वीज देण्यात यावी, वन्यप्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे नुकसानाचा पंचनामा करून पिकांची नुकसानभरपाई देण्यात यावी, शेतकरी आंदोलनात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, आदी मागण्यांसाठी धरणे देण्यात आले. आंदोलनात शेतकरी जागर मंचाचे कृष्णा अंधारे, जगदीश मुरुमकार, मनोज तायडे, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी, विजय देशमुख, राम वर्गे, संजय भाकरे, निलेश देशमुख व इतर उपस्थित होते. शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या ः बाबूराव शिंदे  मागील पंधरा दिवसांपासून वाशीम जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसाने थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिकासह कापूस पिकावर मोठ्या संकट उभे राहले. आधीच अडचणीत असणारा शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेस युवक आघाडीचे वाशीम जिल्हाध्यक्ष बाबूराव शिंदे यांनी केली आहे. त्यांनी शासनाला पाठविलेल्या निवेदनात म्हटले, की या वर्षी  खरिपाची पिके सुरवातीला बहरली होती. परंतु, निसर्गाच्या लहरीपणामुळे या वेळेस पुन्हा शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी पडले आहे, वाशीम जिल्ह्यातील मालेगाव रिसोड तालुक्यात मॉन्सूनोत्तर पावसाने शेतातील सोयाबीनचे पीक नष्ट झाले आहे. सोयाबीनची कापणी करून गंजी मारलेल्या सोयाबीनला कोंब आले आहेत. हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या; स्वाभिमानी संघटना नांदुरा (जि. बुलडाणा) तालुक्यात गेल्या चार वर्षांपासून सतत कोरडा दुष्काळ पडला. या वर्षी ओला दुष्काळ आल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील उडीद, मूग, सोयाबीन, कापूस, ज्वारी, मका, बाजरी अशी सर्वच पिके सडून गेली आहेत. त्यामळे शेतीवर केलेला खर्च व्यर्थ गेला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, पीककर्ज नाही म्हणून शेतकऱ्यांनी उधार, उसनवार करून शेतीची पेरणी केली. पावसामुळे शेतातील पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, मुलामुलींचे शिक्षण, आजारावचे उपचार, लग्न कसे करायचे, असे विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे नांदुरा तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, सक्तीची कर्जवसुली थांबवा, बँक खात्यांवर येणारे अनुदान, पीकविमा कर्ज खात्यांमध्ये वळती करू नये, अशा मागण्यांचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले. या वेळी तालुकाध्यक्ष समाधान भातूरकर, सुरेश राखोंडे, तालुका उपाध्यक्ष दत्तात्रेय अमलकर, जगन्नाथ इटणारे, महेंद्र दांडगे, पुरुषोत्तम भातुरकर, संतोष मुंढे, लहुजी ठाकरे, बाळू आत्तरकर, श्यामराव देवकर, कैलास भातुरकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com