वर्धा : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजप नेत्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडून टाकल्याची घटना घडली होती. या घटनेतील मृत शेतकऱ्यांच्या अस्थींचे विसर्जन पंढरपूर येथील चंद्रभागा नदीत करण्यात आले. वर्धा येथील शेतकरी आरक्षण संकल्पाचे प्रणेते शैलेश अग्रवाल यांची या वेळी उपस्थिती होती. अग्रवाल यांनी लखीमपूर येथील घटनेचा निषेध करीत कृषिप्रधान देशाला काळिमा फासणारी ही घटना असल्याचा आरोप केला. लखीमपूर येथे शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गृह राज्यमंत्र्याच्या मुलाने आपल्या वाहनाखाली चिरडले होते. या घटनेत चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. या मृतकाच्या अस्थींचे विसर्जन देशभरातील पवित्र नद्यांमध्ये केले जात आहे. पंढरपूर येथे शेतकरी आरक्षणाचे प्रणेते शैलेश अग्रवाल यांच्यासह विनायक पाटील व अन्य शेतकरी नेते यांच्या उपस्थितीत अस्थी विसर्जन करण्यात आले. या वेळी शैलेश अग्रवाल यांनी भारताच्या गौरवशाली राजकीय, सामाजिक इतिहासाला लखीमपूरची घटना काळिमा फासणारी असल्याचा आरोप केला. अग्रवाल म्हणाले, ‘‘अशा प्रकारे आंदोलन चिरडले जात असतील तर देशात लोकशाही संपुष्टात आली असेच दुर्देवाने म्हणावे लागेल. दिल्लीच्या सीमेवर सुरू असेलल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल केंद्राकडून घेण्यात आली नाही. हा प्रकार देखील कृषी प्रधान देशाकरीता गौरवपूर्ण नाही. कोणत्याही जाती, धर्म किंवा पक्षात असला तरी शेतकऱ्याने त्यांच्या प्रश्नाप्रती शेतकरी म्हणूनच एकत्र आले पाहिजे. अन्यथा, लखीमपूरच्या घटनांना वारंवार सामोरे जाण्याची वेळ त्यांच्यावर येईल. शेतकरी समाज देशातील एक मोठे कुटुंब आहे. मोक्ष प्राप्तीसाठी अस्थी विसर्जन ही कौटुंबीक क्रिया असून, कुटुंब या नात्यानेच हा विधी करीत आहे.’’ विधिवत पूजनानंतर शैलेश अग्रवाल व विनायक पाटील यांनी वारकऱ्यांसह चंद्रभागा नदीत शेतकरी व पत्रकाराच्या अस्थींचे विसर्जन केले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.