पोलिसांच्या अडवणुकीमुळे मालवाहतूक रखडली

लॉकडाऊनमध्ये मालवाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी केंद्र शासनाने स्पष्ट सूचना दिलेल्या असतानाही राज्यांमधील पोलिस यंत्रणा भलताच अर्थ काढून स्वतःचे नियम लादते आहे.
Transport
Transport

पुणे: लॉकडाऊनमध्ये मालवाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी केंद्र शासनाने स्पष्ट सूचना दिलेल्या असतानाही राज्यांमधील पोलिस यंत्रणा भलताच अर्थ काढून स्वतःचे नियम लादते आहे. यामुळे शेतमाल तसेच इतर सामुग्रीची वाहतूक करणारी व्यवस्था विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.  केंद्रीय मंत्रालयाने मुख्य सचिवांना पाठविलेल्या एका पत्रामधून वाहतूक व्यवस्थेबाबत राज्यांच्या पातळीवर घातल्या गेलेल्या गोंधळावर प्रकाश पडतो. “ देशाच्या विविध भागांमध्ये अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे ट्रक अडवून ठेवले जात आहेत. तसेच, एका राज्याने लॉकडाऊनमध्ये दिलेले परवाने दुसऱ्या राज्यात स्वीकारले नाहीत,” असे गंभीर निरीक्षण खुद्द गृह मंत्रालयाने नोंदविले आहे. “आंतरराज्य मालवाहतूक करणारे मालवाहक ट्रक किंवा इतर वस्तूंची वाहतूक करणारी वाहने यासाठी एक चालक व एक मदतनीस अशा दोघांना प्रवासासाठी केंद्राने मान्यता दिलेली आहे. या वाहनांमध्ये अत्यावश्यक वस्तू असो किंवा नसले तरी वेगळ्या परवान्यांची गरज नसल्याचे केंद्र सांगते. मात्र, आंतरराज्य मालवाहतूकदारांना वेगळ्या परवान्याची सक्ती राज्यात होते. यामुळे घोळ वाढला आहे,” अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.  ट्रकचालकांना अडवू नका  मालवाहतूक करणारी वाहने माल खाली करून झाल्यावर अडवून ठेवली जात असल्याचे चित्र आहे. यातून तयार झालेली समस्या मिटवण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून राज्यांना पुन्हा सूचना पाठवाव्या लागल्या आहेत. माल उतरवणारी वाहने अडकून न ठेवता ट्रकचालकांना पुन्हा माघारी जावू द्या किंवा घरी जाण्यास परवानी द्या, असेही राज्यांना सांगण्यात आले आहे.  “मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाकडे परवाना तसेच रोड परमिट असल्यास ट्रकमध्ये माल नसला तरी मज्जाव करता येणार नाही, अशा स्पष्ट सूचना केंद्र शासनाच्या आहेत. तथापि, परिवहन व पोलिस खात्यात या सूचना क्षेत्रीय पातळीपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे नाक्यानाक्यांवर पोलिस वाहने अडवितात किंवा हुज्जत घातली जाते,” असे महसूल विभागातील पुरवठा कक्षाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.  साडेतीन लाख मालट्रक रस्त्यावर उभे बॉम्बे गुडस् ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सहखजिनदार समशेर सिंग पवार म्हणाले की, लॉकडाऊनमध्ये मालवाहतुकीला प्राधान्य न दिल्याने साडेतीन लाख मालट्रक रस्त्यावर उभे आहेत. या वाहनांमध्ये ३६ हजार कोटी रुपये किमतीचा माल अडकून पडला आहे. मालवाहतुकीचा कणा असलेल्या चालकांकडे दुर्लक्ष झाल्याने आम्ही चिंतेत आहोत.  “महाराष्ट्राच्या रस्त्यांवर देखील हजारो ट्रक अडकून पडलेले आहेत. मालवाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वेळोवेळी उपाय न केल्यामुळे हजारो चालक परराज्यात निघून गेलेले आहेत. पंजाब प्रांतात आता गव्हाची कापणी सुरू झाल्याने तेथील चालक दोन-तीन महिने येणार नाहीत. अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांप्रमाणेच ५० लाखाचा विमा आता ट्रकचालकांनाही द्यावा, अशी मागणी आम्ही  केंद्राकडे केली आहे,’ असे समशेर सिंग पवार यांनी स्पष्ट केले.  पोलिस व परिवहन विभागात समन्वय नाही मालवाहतुकीबाबत राज्यांनी घातलेल्या या गोंधळामुळे देशात अत्यावश्यक वस्तूंची टंचाई तयार होण्याची शक्यता आहे, असेही केंद्राला वाटते. राज्याच्या महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, परिवहन विभाग आणि पोलिस विभागामध्ये स्थानिक पातळीवर अजिबात समन्वय राहिलेला नाही. लॉकडाऊन कालावधीत मालवाहतूक व्यवस्था कशी हाताळायची याबाबत प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे नियम आस्तित्वात आलेले आहेत. त्याचा फटका अन्नधान्य, कृषी क्षेत्राशी संबंधित सामुग्री वाहतुकीलाही बसतो. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com