अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे सिंचन क्षेत्र घटणार

अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे सिंचन क्षेत्र घटणार
अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे सिंचन क्षेत्र घटणार

परभणी : यंदाचा पावसाळा संपत आला, तरी अद्याप निम्न दुधना, सिध्देश्वर, माजलगाव हे मोठे प्रकल्प उणे पाणीसाठ्यामध्येच आहेत. येलदरी प्रकल्प, करपरा मध्यम प्रकल्पांत देखील पुरेसा उपयुक्त पाणीसाठा नाही. अनेक लघु सिंचन तलावांत देखील उपयुक्त पाणीसाठा नाही. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात घट येणार आहे. 

जायकवाडी डाव्या कालव्याचे लाभक्षेत्र, मासोळी मध्यम प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मात्र यंदा रब्बी, उन्हाळी हंगामातील सिंचन आवर्तने मिळण्याची खात्री निर्माण झाल्याने दिलासा मिळाला आहे. यंदा रविवार (ता. २९) पर्यंत जिल्ह्यात ५७१.९० मिमी म्हणजेच वार्षिक सरासरी पावसाच्या ७३.८ टक्के पाऊस झाला. अद्याप २६.२ टक्के पावसाची तूट आहे. पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस न झाल्यामुळे यंदा सेलू तालुक्यातील निम्न दुधना, पूर्णा नदीवरील सिध्देश्वर, माजलगाव या तीन प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा नाही. 

गेल्या दोन आठवड्यांतील पावसामुळे येलदरी, जिंतूर तालुक्यांतील करपरा मध्यम प्रकल्पामध्ये उपयुक्त पाणीसाठा जमा झाला. २२ लघु सिंचन तलावांपैकी केवळ झरी प्रकल्पांमध्ये ९८ टक्के पाणीसाठा आहे. अनेक तलावांतील पाणीसाठा अजून जोत्याखाली आहे. तीन मोठे, एका मध्यम प्रकल्पांमध्ये पिकांच्या सिंचनासाठी पाणी आवर्तने सोडण्यासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही. त्यामुळे रब्बी, उन्हाळी हंगामात सिंचनासाठी पाणी मिळण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. 

जिल्ह्यात पूर्णा प्रकल्प (सिध्देश्वर धरण) सिंचन क्षमता १६ हजार १४२ हेक्टर, निम्न दुधना प्रकल्पाची ३० हजार हेक्टरहून अधिक आहे. परंतु, निम्न दुधनाच्या डाव्या-उजव्या कालव्याच्या वितरण प्रणालीची कामे अपूर्ण आहेत. हेक्टरपर्यंत आहे. स्थानिक स्तर प्रकल्पाची सिंचन क्षमता १२ हजार हेक्टरपर्यंत आहे. परंतु, या प्रकल्पांमध्ये पुरेसा प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध नसल्याने सिंचन क्षेत्रात घट होईल.

रविवारचा प्रकल्पातील पाणीसाठा

रविवारी (ता. २९) सकाळी आठ वाजेपर्यंत जायकवाडी धरणामध्ये शंभर टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. येलदरीमध्ये ६.१७ टक्के, सिध्देश्वरमध्ये उणे २०.८८ टक्के, निम्न दुधनामध्ये उणे १६.९८, करपरामध्ये ३, मासोळीमध्ये ७५ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. माजलगाव धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली. परंतु, उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झालेला नाही.

दोन प्रकल्पांद्वारे आवर्तनाची खात्री

पैठण येथील जायकवाडी धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे नदीपात्रात विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीवरील जिल्ह्यातील उच्च पातळी बंधाऱ्यामध्ये उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पामध्ये ७५ टक्के उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. येथून रब्बी, उन्हाळी हंगामातील सिंचन आवर्तने मिळण्याची खात्री आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जायकवाडी डाव्या कालव्याच्या जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील सिंचनक्षमता ९७ हजार ४०० हेक्टर आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com