उपवितरिकांच्या अपूर्ण कामांचा शेतकऱ्यांना भुर्दंड

गोजोरे, ता.भुसावळ ः शेतकऱ्यांना पाटचारीवर जनित्र ठेऊन पाणी उपसा करून घ्यावा लागत आहे.
गोजोरे, ता.भुसावळ ः शेतकऱ्यांना पाटचारीवर जनित्र ठेऊन पाणी उपसा करून घ्यावा लागत आहे.

जळगाव : वाघूर प्रकल्पाच्या पाटचारीतून पाणी सोडले आहे, पण उपवितरिकांचे काम अनेक भागांत अपूर्ण असल्याने मुख्य चारीतून पाणी उचलण्यासाठी जनित्राचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे भुसावळ तालुक्‍यातील गोजोरे, बेलव्हाय व वराडसीम या गावांतील शेतकऱ्यांना त्यासाठी प्रतिदिन किमान ५०० रुपयांच्या इंधनाचा भुर्दंड बसत आहे.

वाघूर प्रकल्पाच्या पाटचाऱ्यांचे काम अनेक भागांत अपूर्ण आहे. मुख्य पाट व शिवारात चाऱ्यांचे काम केले आहे. परंतु शेतांमध्ये पाणी पोचण्यासाठी आवश्‍यक उपवितरिका तयार केलेल्या नाहीत. मागील वर्षी काही शेतांमध्ये उपवितरिका केल्या; परंतु त्या उन्हाळ्यात तयार केल्या. त्यांची चाचणी घेतली नव्हती.

यंदा चाचणी घेण्यासाठी पाणी सोडले आहे. पण हे पाणी अडखळत पोचत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वाघूर प्रकल्प हा भुसावळ तालुक्‍यातील बेलव्हाय, गोजोरे, वराडसीम भागांतील शेतकऱ्यांनाही लाभदायी ठरणार आहे. परंतु या प्रकल्पाच्या शेतापर्यंत पाणी पोचविणाऱ्या वितरिका तयार झालेल्या नाहीत. मुख्य चाऱ्या आहेत. त्यात सध्या पाणी सोडले आहे. ते पाणी वाहून जात असून, शेतकऱ्यांच्या उपयोगात येत नसल्याची स्थिती आहे.

जनित्राद्वारे उपसा वाहत्या पाण्याचा उपयोग आपल्या शेताला व्हावा म्हणून शेतकरी चारीवर जनित्र लावून पाण्याचा उपसा करीत आहेत. त्यासाठी जनित्राला प्रतिदिन ५०० ते ६०० रुपयांचे डिझेल लागते. डिझेलवर जादा खर्च लागेल म्हणून शेतकऱ्यांनी कमी पाण्यात येणाऱ्या हरभरा व दादर (ज्वारी) पिकाची पेरणी केली आहे. या भागातील जमीन मुरमाड, हलक्‍या प्रकारातील आहे. अनेक शेतकऱ्यांनी परतीच्या पावसानंतर दिवाळीपूर्वीच हरभरा व दादरची पेरणी केली होती. पेरणीला जवळपास एक महिना झाल्याने आता सिंचनाची गरज आहे. त्यामुळे शेतकरी जनित्राद्वारे चारीतून पाणी उपसून ते शेतापर्यंत नेत आहेत. हरभऱ्याला आणखी एक पाणी द्यावे लागेल, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

टचाऱ्या केल्या, पण शेतात पाणी येण्यासाठीच्या उपवितरिका केलेल्या नाहीत. त्यामुळे चारीतून पाणी उचलण्यासाठी जनित्राचा वापर करीत आहे. किमान ५०० रुपये खर्च रोज इंधनासाठी लागतो. - रमेश जगन्नाथ महाजन, शेतकरी, गोजोरे (ता. भुसावळ, जि. जळगाव)

सध्या चाचणीसाठी पाटातून पाणी सोडले आहे. ते कधी बंद होईल ते सांगता येत नाही. ते वाया जाण्यापेक्षा आम्ही जनित्र लावून पाणी उपसून ते पिकांना देत आहोत. त्यासाठी खर्च लागतोय, पण रब्बीतरी हातात येईल, म्हणून ही धडपड करावी लागतेय. - नारायण शंकर राणे, शेतकरी, गोजोरे, जि. जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com