पुणे ः उन्हाचा चटका वाढल्याने धरणांतील पाण्याचा वापर वाढला आहे. यामुळे धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे. मागील चार महिन्यांत सुमारे ५३.९५ टीएमसी पाणीसाठ्याचा वापर झाला आहे. अजूनही १५९.१८ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठा मुबलक असल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाई कमी भासेल, अशी शक्यता जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी वर्तविली.
चालू वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ झाली. जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे भरली. एकूण २१३.१३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला होता. यामध्ये उजनी धरणाचाही समावेश आहे. एक जून रोजी मॉन्सून दाखल झाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला होता. परंतु, जून व जुलैमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहिले. त्यामुळे धरणातील पाणी पातळी फारशी वाढलेली नव्हती. मात्र, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये दमदार पाऊस झाला. त्यामुळे जवळपास सर्वच धरणातून कमीअधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडला होता.
आगामी काळात पाणी टंचाई भासण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र आहे. सध्या वरसगाव, पानशेत, पवना, टेमघर, कासारसाई, मुळशी, कळमोडी, आंध्रा, शेटफळ, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, वीर, नाझरे, डिंभे, उजनी अशा सर्वच धरणांत पाणीसाठा मुबलक आहे. परंतु उन्हाचा पारा वाढत असल्याने पाण्याचा वापर वाढत असल्याचे दिसून येते.
धरणनिहाय उपलब्ध पाणी (टीएमसी)
पिंपळगाव जोगे १.०९, माणिकडोह १.३०, येडगाव १.६०, वडज ०.७८, डिंभे ८.४९, घोड २.९७, विसापूर ०.५०, कळमोडी १.४६, चासकमान ५.१९, भामाआसखेड ६.०३, वडिवळे ०.५५, आंध्रा २.४३, पवना ५.२३, कासारसाई ०.३८, मुळशी ८.१०, टेमघर ०.५१, वरसगाव ९.१४, पानशेत ९.४०, खडकवासला ०.९८, गुंजवणी २.४१,नीरा देवधर ७.७३, भाटघर १७.९३, वीर ५.५९, नाझरे ०.४६, उजनी ३६.५८, चिल्हेवाडी ०.३५.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.