जळगाव ः जिल्ह्यात यंदा उतिसंवर्धित केळी रोपांची लागवड काहीशी वाढली असून यावल, रावेर या केळी उत्पादनात अग्रेसर असलेल्या भागासह जामनेर, पाचोरा व जळगावातही रोपांची लागवड वाढली आहे. दर्जेदार केळीचे उत्पादन व अधिक मिळणारे दर यामुळे उतिसंवर्धित केळी रोपांच्या लागवडीला शेतकरी प्राधान्य देत असल्याची माहिती मिळाली.
आजघडीला कांदेबाग (ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान लागवडीच्या बागा) व आगाप (जानेवारी, फेब्रुवारीत लागवडीच्या बागा) बागा मिळून सुमारे १६ ते १७ हजार हेक्टरवर उतिसंवर्धित रोपांद्वारे केळी लागवड झाल्याची माहिती आहे. आगाप केळी लागवडीसाठीही उतिसंवर्धित केळी रोपांचा वापर होत आहे. सध्या आगाप केळी लागवड जळगावसह जामनेर, मुक्ताईनगर, रावेर भागात सुरू आहे. आंबे बहार म्हणून या आगाप केळी लागवडीला ओळखले जाते.
तसेच पुढे कापूस लागवड कमी करून किंवा कापसाऐवजी केळी लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. केळीखाली यंदाही ४३ ते ४४ हजार हेक्टर क्षेत्र असणार आहे. यात रावेरात सर्वाधिक २० ते २१ हजार हेक्टर क्षेत्र असेल. त्यापाठोपाठ यावलमध्ये सुमारे आठ हजार हेक्टर, मुक्ताईनगरात साडेचार हजार हेक्टर, चोपड्यात तीन हजार हेक्टर, भडगाव व पाचोरा मिळून अडीच हजार हेक्टर जळगाव व जामनेर मिळून तीन हजार हेक्टरवर केळी लागवड होईल, अशी माहिती आहे.
अलीकडे तर मुबलक जलसाठा उपलब्ध असलेल्या भागात एप्रिल व मे या प्रचंड उष्णतेच्या काळातही शेतकरी केळी रोपे वाढवू लागले आहेत. त्यासाठी रोपानजीक धैंचा लागवडीचा आधार शेतकरी घेऊ लागले आहेत.
उतिसंवर्धित केळी रोपे पुरवठादारांची संख्याही जिल्ह्यात वाढली आहे. कंद लागवडीसाठी प्रतिकंद चार रुपयांपर्यंत खर्च येऊ लागला आहे. उतिसंवर्धित रोपे लागवडीसाठी किमान नऊ रुपये व कमाल १२ ते १३ रुपये प्रतिरोप खर्च येत आहे़ पण उत्पादन कंदांच्या तुलनेत अधिक येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
केळीची कंदांद्वारे लागवड महागडी व त्रासदायक होत असतानाच कंदाद्वारे उत्पादित केळीच्या घडांचा दर्जा व उत्पादन निर्यातक्षम मिळत नव्हता. अशातच जळगावच्या केळीऐवजी गुजरात व महाराष्ट्रातील इतर भागातील केळीला व्यापारी पसंती देऊ लागले होते. ही बाब लक्षात घेता जिल्ह्यातील तापी नदीकाठावरील केळी उत्पादकांनी केळीसंबंधी फ्रूट केअर तंत्रज्ञान आत्मसात केले.
उतिसंवर्धित केळी लागवडीसह स्कर्टिंग बॅग, एकात्मिक रोग व्यवस्थापन, फर्टिगेशन व ठिबक यावर शेतकऱ्यांनी भर दिला. रावेर, यावल, मुक्ताईनगर व चोपडा भागातील मोठ्या केळी उत्पादकांनी निर्यातक्षम केळी उत्पादन, बॉक्समध्ये पॅकिंग सुरू केली. आपसूकच केळीला उत्तरेकडील राज्यांमधून मागणी वाढली. सावदा येथून रोज सुमारे सहा ते साडेसहा हजार क्विंटल केळी बॉक्समध्ये पॅकिंग करून उत्तरेकडे पाठविली जाते.