द्राक्ष गुणवत्ता, संधी असूनही जागतिक स्पर्धेत भारत मागे

आजमितीस भारतातून २ लाख टन द्राक्षे निर्यात होतात. सध्याचे युरोपचे मार्केट, तसेच इतरही मार्केटमधील संधी पाहता अजून १० लाख टन निर्यातीस वाव आहे. देशातील १२५ कोटीच्या लोकसंख्येचे मार्केट ही फार मोठी संधी आहे. इतर स्पर्धकांच्या तुलनेत ही संधी फक्त भारतालाच आहे. केवळ उत्पादन आणि पीक संरक्षणापेक्षा आता मार्केटिंगवरच लक्ष केंद्रित करणे ही काळाची गरज आहे. - विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, मोहाडी, नाशिक
द्राक्ष गुणवत्ता, संधी असूनही जागतिक स्पर्धेत भारत मागे
द्राक्ष गुणवत्ता, संधी असूनही जागतिक स्पर्धेत भारत मागे

नाशिक : युरोपीय बाजारपेठेत चिलीची २१ टक्के, तर दक्षिण अाफ्रिकेची ३४ टक्के द्राक्षे दाखल होतात. भारतातील द्राक्षांचे हे  प्रमाण अवघे ७ टक्के आहे. याच स्पर्धक देशांतून एकूण उत्पादनाच्या ७० ते ८० टक्के द्राक्षे निर्यात होतात. भारत इथेही अवघे ६ टक्के आहे.  उत्तम व्यवस्थापन, देशांतर्गत बाजारपेठ याबाबत सरस असूनही केवळ जागतिक दर्जाचे वाण नसल्यामुळे भारतीय द्राक्ष उद्योगाची गती मंदावली आहे.  लोकसंख्या ही आपली जमेची बाजू आहे. जगाच्या दृष्टीने आपण महत्त्वाची बाजारपेठ आहोत. जागतिक बाजाराचा वेग पाहता चिली, दक्षिण अाफ्रिकेची द्राक्षे भारतीय बाजारपेठेत स्थान निर्माण करू शकतात. त्या द्राक्षांनी आपली देशांतर्गत बाजारपेठ काबीज केल्यावर आपण जागे होणार का, असा सवाल जाणकारांमधून उपस्थित केला जात आहे.   रोगप्रतिकारशक्ती असलेली, संजीवकांची गरज नसलेली, नैसर्गिकरीत्या शूगर व आकारवाढ देणाऱ्या द्राक्षांच्या जाती मिळाव्यात, ही द्राक्ष उत्पादकांची प्रमुख मागणी आहे. जगभरात अशाच वाणांना मागणी आहे. भारतीय द्राक्ष उत्पादकांकडे अजूनही ‘थॉमसन’ हेच जुने कालबाह्य झालेले वाण असून, या स्थितीत गुणवत्ता साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. बदलत्या वातावरणात हे जुने वाण रोगाला बळी पडत असल्याने उत्पादन खर्चही वाढत आहे. या स्थितीत जागतिक दर्जाचे वाण मिळावेत ही मागणी द्राक्ष उत्पादक मागील दहा वर्षांपासून करीत आहेत. राज्य द्राक्ष बागायतदार संघ त्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करीत आहे. मात्र शासन स्तरावरून त्याला गती का मिळत नाही, असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे.

नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने दोन वर्षांपूर्वी दक्षिण अफ्रिका व चिली या देशातील नामांकित ब्रीडरकडून द्राक्षाचे काही वाण आयात केले आहेत. या कंपनीच्या प्रांगणात त्याबाबत चाचण्या सुरू आहेत. हे काम अजून मोठ्या स्वरूपात होणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येणे आवश्‍यक आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, द्राक्ष बागायतदार संघ, अपेडा या सर्व संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांतून जागतिक वाणांच्या निर्मितीला, तसेच आयातीला गती देणे महत्त्वाचे आहे. जागतिक स्पर्धेचा वेग पाहता आपल्याला त्यासाठी युद्ध पातळीवर वेगाने काम करणे गरजेचे आहे, असाही सूर व्यक्त होत आहे.  प्रतिक्रिया जागतिक दर्जाच्या द्राक्ष वाणांच्या आयातीसाठी द्राक्ष बागायतदार संघाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र आता या कामाला सर्वांनी एकत्र येऊन गती देणे गरजेचे आहे. - अशोक गायकवाड, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, पुणे

मातीची घटलेली सुपीकता, वातावरणातील बदल ही आव्हाने तर आहेतच. त्यावर दर्जेदार वाणांच्या संशोधनातूनच मात करता येणे शक्‍य होणार आहे. येत्या काळात त्यादृष्टीने प्रयत्न आवश्‍यक आहेत. - अनंत मोरे, प्रयोगशील द्राक्ष उत्पादक

स्पर्धक देशांत ज्याप्रमाणे वाणांची निर्मिती, संशोधन यावर काम होते, त्या तुलनेत आपल्याकडील संशोधनाची गती कमी आहे. जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी आता चांगल्या वाणांशिवाय पर्याय दिसत नाही. - मनोज जाधव, प्रयोगशील द्राक्ष उत्पादक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com