नवी दिल्ली : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकरी संघटनांनी आज (ता. ८) पुकारलेल्या बंदची जय्यत तयारी झाली आहे. विविध राजकीय पक्ष, कामगार संघटनांनी पाठिंबा दिल्यामुळे या बंदला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी शक्यता शेतकरी संघटनांचे नेते व्यक्त करीत आहेत.
सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत होणाऱ्या या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. बंद विषयी बोलताना भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले, ‘‘ केंद्र सरकारच्या काही धोरणांना आमचा विरोध आहे, हे दाखवून देण्यासाठी बंदचे आवाहन करण्यात आले आहे. हा बंद पूर्णपणे शांततामय मार्गाने होईल. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक आणि टोल नाके बंद करू ’’ स्वराज इंडियाचे अध्यक्ष योगेंद्र यादव म्हणाले, ‘‘देशभरात अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व व्यवहार बंद राहतील. आरोग्य सेवा सुरू राहतील. मात्र दूध, पालेभाज्या, फळभाज्यांचा पुरवठा शेतकरी करणार नाहीत. मात्र, कोणी पुरवठा करीत असल्यास तो रोखला जाणार नाही. तिन्ही कायदे मागे घ्या, हीच आमची मागणी आहे आणि आम्ही त्यावर ठाम आहोत. हे आंदोलन आता फक्त पंजाबच्या शेतकऱ्यांचे राहिले नाही, पूर्ण देशाचे झाले आहे.’’
विरोधी पक्ष संधीसाधू : रविशंकर प्रसाद ़''विरोधी पक्ष संधीसाधू आहेत. यूपीए सरकार जे दहा वर्षांपूर्वी करण्याचे प्रयत्न करीत होते, तेच आम्ही आता करीत आहोत. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सारखे पक्ष विरोधासाठी विरोधाची, संधीसाधू भूमिका घेऊन कृषी कायद्यांना विरोध करीत आहेत. सरकारच्या सर्वच कायद्यांना, उपाययोजनांना विरोध केला जात आहे. काँग्रेसने या बाबतचे आश्वासन २०१९च्या निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते. त्यांनाही आंतरराज्य व्यापार करमुक्त करावयाचा होता,’’ असा आरोप केंद्रीय आरोग्य मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला आहे.
अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कनोज येथून केंद्राच्या कृषी कायद्याचा निषेध करण्यासाठी किसान यात्रा काढण्यात येणार होती. या यात्रेसाठी बाहेर पडताना पोलिसांनी त्यांना अडविले. यादव यांनी आपल्या समर्थकांसह पोलिसांनी अडविलेल्या जागीच ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर त्यांना कार्यकर्त्यांसह ताब्यात घेण्यात आले.
`स्टेडियमचेे तुरुंग करण्यासाठी दबाव‘’ दिल्लीत सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील नऊ स्टेडियमचे तात्पुरत्या तुरुंगात रूपांतर करण्यासाठी माझ्यावर दबाव येत आहे, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. केजरीवाल यांनी सिंघु सीमेवरी आंदोलनाला भेट दिली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
जुने कायदे ओझे : पीएम मोदी `मागील शतकातील कायद्यांच्या आधारे पुढील शतकाचे निर्माण करता येत नाही. मागील शतकातील कायदे आता ओझे ठरतात. त्यासाठी सतत सुधारणा करावी लागते,` असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी आग्रा येथील मेट्रो रेल्वेच्या उभारणीच्या कामाचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन केले, त्यावेळी ते बोलत होते. मोदी म्हणाले, ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास, या सुत्रांंनुसार सरकार काम करीत आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक निवडणुकीत भाजपवर विश्वास दाखविला जात आहे.` मोदींनी शेतकरी आंदोलनाचा उल्लेख केला नाही. पण, जुने कायदे बदलण्याचे त्यांचे वक्तव्य आंदोलनाविषयी होते, असे मानले जात आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.