बुलडाणा : कांद्याचे निकृष्ट बियाणे शेतकऱ्यांच्या माथी

मध्यंतरीच्या काळात कांद्याच्या किमती वाढल्यानंतर लागवडीकडे ओढा वाढला. शेतकऱ्यांकडून होत असलेल्या मागणीचा काही व्यापारी, विक्रेत्यांनी जोरदार फायदा घेतला असून, गुणवत्ता नसलेले कांद्याचे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले आहे.
बुलडाणा : कांद्याचे निकृष्ट बियाणे शेतकऱ्यांच्या माथी
बुलडाणा : कांद्याचे निकृष्ट बियाणे शेतकऱ्यांच्या माथी

बुलडाणा : मध्यंतरीच्या काळात कांद्याच्या किमती वाढल्यानंतर लागवडीकडे ओढा वाढला. शेतकऱ्यांकडून होत असलेल्या मागणीचा काही व्यापारी, विक्रेत्यांनी जोरदार फायदा घेतला असून, गुणवत्ता नसलेले कांद्याचे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले आहे. या बियाण्याची उगवण न झाल्याने आता शेतकरी फसल्याचे स्पष्ट होऊ लागले.

प्रामुख्याने संग्रामपूर तालुक्यात शेतकऱ्यांना अशा प्रकारचे बियाणे कृषी केंद्रधारकांनी विकले असून, या व्यवहाराची कुठलीही पावती शेतकऱ्यांना दिली नव्हती. या प्रकारामुळे कृषी खात्याची गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा व स्थानिक कृषी अधिकाऱ्यांच्या कामकाजावरच आता प्रश्‍नचिन्ह उभे होऊ लागले आहे.  मिळालेल्या माहितीनुसार संग्रामपूर तालुक्यातील कांद्याचे अशा प्रकारचे निकृष्ट दर्जाचे बियाणे मोठ्या प्रमाणात विक्री झाले आहे. बुलडाणा जिल्ह्यासह लगतच्या इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही हे बियाणे दिले गेले आहे. बियाणे विक्रीत संबंधित विक्रेत्यांची कोट्यवधीची उलाढाल झाली आहे. या विक्री व्यवहाराची कुठलीही पावती शेतकऱ्यांना दिलेली नाही. संग्रामपूर तालुक्यात विविध गावात अशा प्रकारचे कांदा बियाणे खरेदी केलेले शेतकरी फसले आहेत. कांदा बियाण्याची उगवण अवघी दहा ते पंधरा टक्के झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. तालुक्यात बियाणे विक्रीचा अशा प्रकारचा गोरखधंदा सुरू असताना कृषी विभागाच्या स्थानिक यंत्रणेने कुठलेही लक्ष दिले नाही. कांदा बियाणे फसवणुकीनंतर या बाबत कुठलाही अधिकारी आता बोलायला तयार नाही. शेतकऱ्यांनी लेखी तक्रार करण्याचा सल्ला दिल्या जात आहे. 

सर्वच आलबेल

संग्रामपूर तालुक्यात कांद्याची लागवड किती झाली, यासाठी किती बियाणे व कोणत्या कंपनीचे विक्री झाले याची माहिती कुठेही उपलब्ध नाही. विविध कंपन्यांनी पॅकिंग करून कांद्याचे बियाणे विक्रेत्यामार्फत शेतकऱ्यांना दिले आहे. खरेदीच्या पावत्या नसल्याने शेतकऱ्यांना तक्रारी करण्यास अडचण झालेली आहे तर दुसरीकडे  तक्रार नसल्याने कारवाई करण्यासाठी कृषी यंत्रणा हतबल बनलेली आहे. यात नुकसान शेतकऱ्यांचे झालेले आहे. काही शेतकऱ्यांना विक्रेत्याने परस्पर भरपाई करून दिली आहे. आता तक्रारींचा ओघ वाढत चालल्याने हा प्रकार जिल्हाभर चर्चेत आला आहे. जिल्हास्तरीय कृषी यंत्रणा या बाबत काय कारवाई करते याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com