नागपूर : विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या संत्र्याच्या आयात शुल्कात बांगलादेशने केलेली वाढ मागे घ्यावी, याकरिता वाणिज्य मंत्रालयाने आवश्यक ते प्रयत्न करावे आणि संत्रा उत्पादकांना दिलासा द्यावा, अशा आशयाचे पत्र केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी दिले आहे.
मंत्री गडकरी यांनी पत्रात म्हटले आहे, की संत्रा हे विदर्भाचे मुख्य फळ पीक आहे. सुमारे एक लाख २६ हजार हेक्टरवर संत्रा लागवड क्षेत्र विस्तारलेले आहे. या माध्यमातून सात लाख टन संत्र्याचे उत्पादन होते. विदर्भातील एकूण उत्पादनापैकी १.५० लाख ते १.७५ लाख टन संत्र्याची निर्यात बांगलादेशला केली जाते. त्यावरूनच बांगलादेश हा नागपुरी संत्र्याचा मोठा आयातदार आहे हे स्पष्ट होते. उत्पादित संत्र्यापैकी उर्वरित फळांची विक्री भारतीय बाजारपेठेत होते.
‘‘बांगलादेश सरकारने नुकतीच आयात शुल्कात ३१ टका (बांगलादेशी चलन) वरून ३८.९० टका प्रति किलो अशी वाढ केली. या दरवाढीमुळे संत्रा उत्पादक आणि निर्यातदारांचे हात मात्र रिकामेच राहिले आहेत. त्यामुळे हा प्रश्न संबंधित यंत्रणांपर्यँत नेत शेतकरी हिताच्या दृष्टीने आयात शुल्क कमी करून दिलासा देण्याचा प्रयत्न व्हावा,’’ असेही पत्राच्या शेवटी नमूद करण्यात आले आहे.
ऑल इंडिया इंडो-बांगला संत्रा निर्यातदार संघटनेच्या वतीने नितीन गडकरी यांना या संदर्भाने निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची दखल घेत गडकरी यांनी वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना व्यापक शेतकरी हित लक्षात घेता या प्रकरणात अपेक्षित हस्तक्षेप व सहकार्याची विनंती केली आहे. पत्राच्या प्रति विदेश मंत्री एस.जयशंकर, कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर, बांगलादेश मधील भारतीय राजदूत विक्रम दोराईस्वामी यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.