कोरडवाहु शेती संपूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. पडलेल्या पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असते. त्यासाठी मुलस्थानी जलसंधारण अत्यंत महत्त्वाचे ठरते. हवामान बदलामुळे पावसाचे उशिरा होणारे आगमन, दोन पावसामध्ये पडणारे मोठे खंड, असमान वितरण, लवकर निर्गमन, ओला किंवा कोरडा दुष्काळ यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत न मुरता उताराच्या दिशेने वाहून जाते, यामुळे जमिनीची धूपही होते. अशा परिस्थितीत जमिनीची धूप थांबवणे आणि पडलेल्या पावसाचे पाणी पडेल, त्या जागी मुरवणे आवश्यक असते. यालाच मुलस्थानी जलसंधारण असे म्हणतात.
कोरडवाहू शेतीसाठी महत्त्वाच्या उपाययोजना
मुलस्थानी जलसंधारणाच्या पद्धती
उताराला आडवी पेरणी जमिनीला नियमित उतार असलेल्या क्षेत्रावर उताराला आडवी पेरणी करावी. अशा जमिनीवर नांगरणी, वखरणी, पेरणी तसेच कोळपणी सारखी कामे उताराला आडवी केल्यास, जमिनीच्या भुपृष्ठावरून वाहणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होतो. अधिक पावसाचे पाणी शेतात मुरण्यास मदत होते. जमिनीची धूप होण्याचा धोका कमी होतो.
जलसंधारण सरी शेतात उताराला आडव्या दिशेने १० मी. अंतरावर ४५ ते ६० सें.मी. रुंद व ३० सें.मी. खोल त्रिकोणी आकाराच्या सऱ्या बैलचलीत नांगराने किंवा कोळप्याने पेरणीपूर्वी कराव्यात. अशा सरीस ०.२ ते ०.४ टक्के उतार दिल्यास अतिवृष्टीच्या काळात जास्तीचे पाणी शेताबाहेर काढण्यास उपयोगी पडते. दोन सरी दरम्यानच्या क्षेत्रातील पावसाचे अतिरिक्त पाणी सरीमध्ये साठविले जाते. ते जमिनीत मुरते. ही सरी पीक काढणीपर्यंत नियमित राखण्यात यावी. ओळीत पेरण्यात येणाऱ्या आंतरपिकांकरिता ही पद्धत उपयुक्त आहे.
उभ्या पिकात ठराविक ओळींनंतर सरी काढणे खरीप पिकाची पेरणी झाल्यानंतर ३० ते ४० दिवसांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण झाल्यानंतर, उभ्या पिकात २, ४ किंवा ६ ओळीनंतर कोळप्याच्या साह्याने किंवा बळीराम नांगराने सरी काढण्यात यावी. दोन सरी दरम्यानच्या क्षेत्रातील पाणी सरीत साठवून जमिनीत मुरते. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यातील पावसाचे पाणी यशस्वीरीत्या मुरविण्यासाठी या सरीचा चांगला उपयोग होतो. कापूस, तूर यासारख्या पिकांमध्ये दोन ओळीनंतर तर ज्वारी, बाजरी, सोयाबीन सारख्या कमी अंतरावरील पिकांमध्ये ४ ते ६ ओळीनंतर सरी काढण्यात यावी.
बंदिस्त सरी हलक्या तसेच मध्यम उताराच्या जमिनीवर बळीराम नांगराने किंवा कोळप्याने उताराला आडव्या सऱ्या काढल्याने, सरीतील माती ओळीत लागून वरंबे तयार होतात. जास्त अंतरावरील पिकांसाठी ही पद्धत उपयोगी आहे. पेरणीनंतरची आंतरमशागतीची कामे पूर्ण झाल्यानंतर, सऱ्या सलग न ठेवता सऱ्यामध्ये १० मीटर अंतरावर आडवे वरंबे तयार करण्यात येतात. आडव्या वरंब्यामुळे सरीत जमा झालेले पाणी उताराकडे न वाहता, आहे तिथेच जमिनीत मुरते. कापूस, तूर यासारख्या पिकांसाठी ही पद्धत उपयुक्त आहे.
रुंद वरंबा- सरी पद्धत भारी जमिनीत जलसंधारण तसेच अतिरिक्त पाण्याच्या निचऱ्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे. पिकांच्या ओळींनुसार वरंब्याची रुंदी ठेवून वरंब्याच्या दोन्ही बाजूला बैलाच्या नांगराने सऱ्या पाडून, वरंब्यावर ओळीत लावणी/पेरणी करावी. साधारणपणे पिकांच्या २ किंवा ३ ओळी वरंब्यावर येतात. सऱ्यांना ०.१ ते ०.३ टक्के उतार देण्यात येतो. त्यामुळे जमिनीत न मुरलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यास मदत होते.
संपर्क- गजेंद्र आढावे, ७२६४९२७७८७ (कार्यक्रम सहाय्यक, कृषी विज्ञान केंद्र, खामगाव अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.