कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत न मुरता उताराच्या दिशेने वाहून जाते. यामुळे जमिनीची धूपही होते. अशा परिस्थितीत जमिनीची धूप थांबविणे आणि पडलेल्या पावसाचे पाणी पडेल त्या जागीच मुरविणे आवश्यक आहे.
कोरडवाहू पट्ट्यात उताराच्या तसेच पडीक जमिनीवर चर खोदून वृक्ष लागवड करावी. समपातळीमध्ये मशागत करावी. जैविक बांध घालावेत. मूलस्थानी जलसंधारण पद्धतीचा अवलंब करावा. कोरडवाहू पिकांकरिता संरक्षित सिंचनाचा वापर करावा. उताराला आडवी पेरणी जमिनीला नियमित उतार असलेल्या क्षेत्रावर उताराला आडवी पेरणी करावी. अशा जमिनीवर नांगरणी, वखरणी, पेरणी तसेच कोळपणीसारखी कामे उताराला आडवी केल्यास जमिनीच्या भूपृष्ठावरून वाहणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होऊन जास्तीत जास्त पावसाचे पाणी शेतात मुरते. जमिनीची धूप होण्याचा धोका टळतो. जलसंधारण सरी
शेतात उताराला आडव्या दिशेने १० मी. अंतरावर ४५ ते ६० सेंमी रुंद व ३० सेंमी खोल त्रिकोणी आकाराच्या सऱ्या बैलचलित नांगराने किंवा कोळप्याने पेरणीपूर्वी कराव्यात. अशा सरीस ०.२ ते ०.४ टक्के उतार दिल्यास अतिवृष्टीच्या काळात जास्तीचे पाणी शेताबाहेर काढण्यास उपयोगी पडतात. दोन सरी दरम्यानच्या क्षेत्रातील पावसाचे अतिरिक्त पाणी सरीमध्ये साठविले जाते. जमिनीत मुरते. ही सरी पीक काढणीपर्यंत नियमित राखावी. ओळीत पेरण्यात येणाऱ्या आंतरपीक पद्धतीकरिता ही पद्धत उपयुक्त आहे. उभ्या पिकात ठरावीक ओळींनंतर सरी
खरीप पिकाची पेरणी झाल्यानंतर ३० ते ४० दिवसांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण झाल्यानंतर उभ्या पिकात २, ४ किंवा ६ ओळींनंतर कोळप्याच्या साह्याने किंवा बळीराम नांगराने सरी काढण्यात यावी. दोन सरी दरम्यानच्या क्षेत्रातील पाणी सरीत साठवून जमिनीत मुरते. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यातील पावसाचे पाणी यशस्वीरीत्या मुरविण्यासाठी या सरीचा चांगला उपयोग होतो. ३) कापूस, तूर यासारख्या पिकांमध्ये दोन ओळींनंतर; तर ज्वारी, बाजरी, सोयाबीनसारख्या कमी अंतरावरील पिकांमध्ये ४ ते ६ ओळींनंतर सरी काढण्यात यावी. हलक्या तसेच मध्यम उताराच्या जमिनीवर बळीराम नांगर किंवा कोळप्याने उताराला आडव्या सऱ्या काढल्याने सरीतील माती ओळीत लागून वरंबे तयार होतात. जास्त अंतरावरील पिकांसाठी ही पद्धत उपयोगी आहे. पेरणीनंतरची आंतरमशागतीची कामे पूर्ण झाल्यानंतर सऱ्या सलग न ठेवता सऱ्यामध्ये १० मीटर अंतरावर आडवे वरंबे तयार करावेत. आडव्या वरंब्यामुळे सरीत जमा झालेले पाणी उताराकडे न वाहता आहे तिथेच जमिनीत मुरते. कापूस, तूर यासारख्या पिकांसाठी ही पद्धत उपयुक्त आहे. ही पद्धत भारी जमिनीत जलसंधारण तसेच अतिरिक्त पाण्याच्या निचऱ्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे. पिकांच्या ओळींनुसार वरंब्याची रुंदी ठेवून वरंब्याच्या दोन्ही बाजूला बैलाच्या नांगराने सऱ्या पाडून, वरंब्यावर ओळीत पेरणी करावी. साधारणपणे पिकांच्या २ किंवा ३ ओळी वरंब्यावर येतात. सऱ्यांना ०.१ ते ०.३ टक्के उतार द्यावा. त्यामुळे जमिनीत न मुरलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यास मदत होते. संपर्क - गजेंद्र आढावे ७२६४९२७७८७ (कार्यक्रम सहायक, कृषी विज्ञान केंद्र, खामगाव, जि. बीड)