केंद्रीय पथकाची धावत्या दौऱ्यातच पाहणी

दुष्काळी पथक
दुष्काळी पथक

पुणे ः राज्यातील भीषण दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक राज्यात दाखल झाले. मात्र पथकाचा दौरा व्यस्त आणि घाईचा असाच ठरला. पथकाने अनेक ठिकाणी काही मिनिटेच थांबत पाहणी केली. कुठे रस्त्यात थांबून तर कुठे बांधावरून संवाद साधला. त्यामुळे दुष्काळाची दाहकता भीषण असताना धावत्या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.  केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाने गुरुवारी (ता. ६) परभणी, जालना, बीड, सोलापूर, सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्यांत पाहणी केली. या वेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा पथकासमोर मांडल्या. पथकाने गणेशपूर (ता. सेलू, जि. जालना) येथील त्रिवेणीबाई रामचंद्र गिते यांच्या कपाशीच्या शेताची पाहणी करून दौऱ्यास सुरवात केली. त्यानंतर पेडगाव (ता. परभणी) रुढी (ता. मानवत) या दोन गावांच्या शिवारास भेट देऊन पीक परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्‍यातील आंधळगाव आणि सांगोला तालुक्‍यांतील राजापूर गावांना पथकाने धावती भेट दिली. तर जळगाव जिल्ह्यातील अमनेरमध्ये पाहणी केली.

अवघ्या सात मिनिटांत पाहणी सांगलीहून सातारा जिल्ह्यात केंद्रीय पथक आले. त्यांनी शेनवडी येथील खिलारे यांच्या शेतात तीन वाजता आले आणि अवघे सात मिनिटे पाहणी केली. यामध्ये शेतकऱ्यांशी दोन मिनिटे चर्चा झाली. दुष्काळाची दहाकता गंभीर होत असतानाही पथकाने मात्र, कमी वेळ दिला गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शेतकऱ्यांनी ताफा रोखला केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाचा पेडगांव (ता. परभणी) शिवारातील नियोजित दौरा गुरुवारी (ता. ६) सकाळी रद्द करून थेट रुढी (ता. मानवत) येथे पथक जाणार असल्याची माहिती मिळताच शेतकरी संतप्त झाले. मानवत रोड येथील रेल्वे क्राॅसिंगच्या फाटकावर थांबलेल्या पथकाच्या गाड्या गाठत शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर पथकाने पेडगाव शिवारात दाखल होत पाहणी केली. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या

  • शेतकरी कुटुंबांना महिन्याला पाच हजार रुपये दुष्काळ निर्वाह भत्ता द्यावा
  • संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी
  • पीकविमा परतावा मंजूर करावा
  • हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी
  • गावात रोजगार हमीची कामे सुरू करावी
  • जनावरांना दावणीवरच चारा उपलब्ध करून द्यावा
  • पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची सोय करावी
  • सर्वांना समान रेशन उपलब्ध करून द्यावे
  • बटईने शेती करणाऱ्यांना देखी ५० हजार रुपये खावटी देण्यात यावी
  • प्रतिक्रिया दीड एकरमध्ये दीड क्विंंटल कापूस झाला. चारदा खत घातल, पाच फवारण्या केल्या, मजुरीसह ४० हजार रुपये खर्च आला. यंदा काही साधलंच नाही. - त्रिवेणीबाई गिते , शेतकरी, गणेशपूर, जि. परभणी. दोन वर्षांपासून पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे पशुधन कसे वाचवायचे असा प्रश्‍न उपस्थित राहिला आहे. शासकीय योजना राबवाव्यात. - अमोल विठ्ठल खरात, सरपंच, मानेवाडी, ता आटपाडी.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com