गोंदिया : अतिवृष्टी आणि मॉन्सूनोत्तर पावसामुळे जिल्ह्यात धानपिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतपिकांचे उत्पादन अर्ध्यावर आले. काही शेतकऱ्यांना केवळ तणस घरी नेण्याची वेळ आली आहे. त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. अशावेळी प्रशासनाने केवळ पंचनामे करून गप्प बसण्यात धन्यता मानल्याचे दिसते. याबाबतचे निवेदनही तहसीलदार भुरे यांना दिले आहे.
जिल्ह्यात नुकसानभरपाईचे पाऊल अद्याप उचललेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे. यासाठी प्रशासनाने नुकसानभरपाई त्वरित द्यावी, बॅंकांची दिवाळखोरी थांबवावी, अशी मागणी सालेकसा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे. या वेळी माजी मंत्री भरत बहेकार, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम (बाबा) कटरे, तालुकाध्यक्ष वासुदेव चुटे, जिल्हा परिषदेच्या सभापती लता दोनोडे, कैलास अग्रवाल, ओमप्रकाश ठाकरे, लखनलाल अग्रवाल, शैलेश बहेकार, विजय फुंडे, नीतेश शिवणकर, आशुतोष असाटी, मंगेश चुटे, राजू जैन, ओमप्रकाश लिल्हारे, गुनाराम मेहर, मुकेश बैस, राजेश अडमे, मुस्ताक अन्सारी, संजय दोनोडे, मनोहर बारसे, रितेश लिल्हारे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
गोंदिया येथील सावित्रीबाई फुले भाजीविक्रेता संघाचे अध्यक्ष कृष्णकुमार लिल्हारे यांनी तलाठ्यांमार्फत मंडळनिहाय शेतपिकांचे सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.
सडक अर्जुनी : अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना सरकारने जमिनीचे पट्टे वाटले. सातबाराही दिला. शेतकरी आपल्या शेतात धानाचे उत्पादन घेतात. मागील वर्षापर्यंत त्यांचे धान शासकीय धानखरेदी केंद्रावर घेतले जात होते. पण, या वर्षी सरकारने नमुना आठ मागितला आहे. मात्र, या जमिनीचा नमुना ८ ‘अ’ मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण झालेली आहे. दरम्यान, ही अट शिथिल करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.