बुलडाणा ः जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचा पीकविमा बँकांनी कर्जखात्यात जमा केला असून याविरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आवाज उठविताच कृषी खात्याने बँकांना ही रक्कम बचत खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना कोरोना संकटाच्या काळात पीकविम्याची मदत मिळू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात काही शेतकऱ्यांचा पीकविमा कर्ज खात्यात जमा करण्यात आला असून शेतकरी या लाभापासून वंचित होते. याविरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर कृषी खाते खडबडून जागे झाले. प्रामुख्याने संग्रामपूर तालुक्यातील बँकांनी कर्जखात्यात जमा केलेला पीकविमा शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शेतकऱ्यांचा पीकविमा मंजूर होऊन बँकांनी कर्जखात्यात जमा केला होता. मुळात शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची रक्कम कर्ज खात्यात जमा करणे किंवा रोखून ठेवणे हे नियमबाह्य आहे. त्यामुळे ऐन पेरणीच्या दिवसामध्ये शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आले आहेत. पेरणीला लागणारे खते, बी-बियाणे खरेदी करायचे कसे हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. या प्रश्नावर स्वाभिमानीने आवाज उठविला होता. त्याची कृषी विभागाने तातडीने दखल घेत आदेश दिले आहेत.
बँकांनी शेतकऱ्यांच्या विरोधात आडमुठी भूमिका न घेता शेतकऱ्यांकडून पीकविम्यासंदर्भात आलेले अर्जानुसार तत्काळ रक्कम बचत खात्यात वर्ग करावी. बँक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केल्यास त्या बँकेच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पुन्हा आंदोलनाचे शस्त्र हातात घेईल, असा इशारा संघटनेचे विदर्भ युवा आघाडी अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी बँकांना दिला आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.