सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता.वेंगुर्ला) येथील शेतकऱ्यांनी आंबा, काजू या मुख्य पिकांन
ताज्या घडामोडी
विमा कंपन्यांनी सरसकट भरपाई द्यावी - खासदार भावना गवळी
कुठलेच निकष न ठेवता कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणाच्या आधारावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्याची मागणी खासदार भावना गवळी यांनी केली आहे.
यवतमाळ : जिल्ह्यातील ४ लाख ६७ हजार २१ शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा काढला आहे. यामधील फक्त ८ हजार ३४५ शेतकऱ्यांनाच पीक विमा अंतर्गत नुकसानभरपाई मिळणार असल्याची धक्कादायक माहिती आढावा बैठकीतून समोर आली. दरम्यान, कुठलेच निकष न ठेवता कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणाच्या आधारावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्याची मागणी खासदार भावना गवळी यांनी केली आहे.
पीकविमा कंपनीचे अधिकारी तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले फक्त ४ हजार ९७१ शेतकरी मदतीसाठी पात्र ठरत असल्याची माहिती विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. एवढेच नव्हे तर पीक कापणी नंतर आलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असताना फक्त ३ हजार ३७४ शेतकऱ्यांनीच अर्ज दाखल केले आहे. या एकूण ८ हजार ३४५ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी विमा कंपनीने मान्य केली.
मात्र, जिल्ह्यातील लाखो कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असताना बोटावर मोजता येईल इतक्याच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार असल्याने भावना गवळी यांनी आपला संताप व्यक्त केला.
कृषी विभागाने जवळपास साडेचार लाख शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित झाल्याचा अंदाज आपल्या प्राथमिक सर्वेक्षणातून वर्तविला आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या सर्वेक्षणानुसार सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी भावना गवळी यांनी केली. अवकाळी पावसामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना शेतकरी अर्ज करू शकले नाहीत. अनेकांजवळ अॅन्ड्राइड मोबाईल नाहीत. ७२ तासांत अर्ज करण्याची पद्धत अनेकांना समजली नाही. एवढेच नव्हे तर पीक काढणी कालावधी २७ सप्टेंबर ते ऑक्टोबरचा पहिला आठवडा ठरला असला तरी सततच्या पावसामुळे शेतकरी आपला माल काढू शकला नाही. त्यामुळे अनेकांनी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आपला शेतमाल शेताबाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
आता, नियमांवर बोट ठेऊन नुकसान भरपाईपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे अटी शर्ती बाजूला ठेऊन आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी भावना गवळी यांनी केली आहे. बैठकीला तहसीलदार कुणाल झाल्टे, कृषी विभागाचे जगन राठोड, वानखडे, उमरे, शिवा जाधव, विमा कंपणीचे अर्जुन राठोड, हेमंत शिंदे, तसेच शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा उपसंपर्क प्रमुख संतोष ढवळे, शहर प्रमुख पिंटू बांगर, राजू नागरगोजे, डॉ. प्रसन्न रंगारी, ठिबक तुषार असोसिएशनचे गुणवंत ठोकळ उपस्थित होते.
- 1 of 1025
- ››