सामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण शक्य

शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त सक्रिय होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. वाळलेल्या कुजलेल्या गवताखाली, पिकांच्या खोडाशेजारी, बांधाला किंवा दगडाच्या सापटीत ३ ते ५ सेंमी खोल माती भुसभुशीत करून त्यात अंडी घालतात.
African snails and their eggs
African snails and their eggs

शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त सक्रिय होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. वाळलेल्या कुजलेल्या गवताखाली, पिकांच्या खोडाशेजारी, बांधाला किंवा दगडाच्या सापटीत ३ ते ५ सेंमी खोल माती भुसभुशीत करून त्यात अंडी घालतात. एक गोगलगाय ३-४ दिवसांत साबुदाण्याच्या आकाराची पांढरट पिवळसर रंगाची १०० ते ४०० अंडी घालते. सद्यःपरिस्थितीत विविध ठिकाणी शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. शेतात गोगलगायींचा प्रादुर्भाव किती प्रमाणात झालेला आहे, हे जाणून घेण्यासाठी पिकांचे वेळोवेळी निरीक्षण करावे. प्रादुर्भाव झाल्यानंतर वेळीच नियंत्रणाच्या उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. शंखी गोगलगायीच्या प्रादुर्भावावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी, गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. ओळख 

  • शास्त्रीय नावः  अचेटिना फिलिका
  • शंखी गोगलगाय गर्द, करड्या फिक्कट किंवा हिरव्या काळपट रंगाच्या असतात. 
  • शरीर चिकट, ओलसर व लुसलुशीत असून चालताना त्या पृष्ठभागावर चिकट पदार्थ सोडतात. 
  • पाठीवर बदामी रंगाचा शंख असून त्यावर फिक्कट-तपकिरी रंगाचे लांबट पट्टे असतात. किडीच्या डोक्यावर दोन शिंगासारखे मऊ अवयव असतात. 
  • अनुकूल हवामान 

  • उष्ण कटिबंधीय व जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात.
  • ढगाळ वातावरण व पावसाळ्यात रात्रीच्या वेळी ही कीड जास्त सक्रिय व कार्यक्षम असते. दिवसा झाडांवर, गवताखाली, दगडांच्या सापटीत किंवा बांधावरील पालापाचोळ्यामध्ये लपून बसतात.
  • पावसाळ्यातील ढगाळ वातावरण, दलदल, सावली, कमी सूर्यप्रकाश, जास्त पाऊस, ८० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता, ९ ते २९ अंश सेल्सिअस तापमान किडीच्या वाढीसाठी पोषक असते.
  • जीवनक्रम 

  • शंखी गोगलगाय ऑक्टोबर ते मे महिन्याच्या कालावधी जमिनीमध्ये खोलवर सुप्त अवस्थेत जातात. व पाऊस पडल्यानंतर जमिनीतून बाहेर येतात.  
  • अन्नपाण्याशिवाय त्या चार ते सहा महिने जिवंत राहू शकतात. ही कीड जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त सक्रिय होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. 
  • वाळलेल्या कुजलेल्या गवताखाली, पिकांच्या खोडाशेजारी, बांधाला किंवा दगडाच्या सापटीत ३ ते ५ सेंमी खोल माती भुसभुशीत करून त्यात अंडी घालतात. 
  • एक गोगलगाय ३-४ दिवसांत साबुदाण्याच्या आकाराची पांढरट पिवळसर रंगाची १०० ते ४०० अंडी घालते. तापमान १५ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असल्यास, अंड्यातून १७ दिवसांत  पिल्ले बाहेर पडतात.
  • नर आणि मादी ही दोन्ही लिंगे एकाच गोगलगायीमध्ये असल्यामुळे त्यांचे प्रजनन जलद होते. त्यामुळे त्यांची संख्या झपाट्याने वाढते.   
  • सुरुवातीच्या काळात पिल्लांचा खाण्याचा वेग जास्त असतो. 
  • शंखी गोगलगायींचा जीवनकाळ ५ ते ६ वर्षांचा असतो. 
  • प्रसार  शेतामध्ये वापरली जाणारी अवजारे, बैलगाडी, यंत्रसामग्री, ट्रॅक्टर, ट्रॉली तसेच प्लॅस्टिक, शेणखत, विटा, वाळू, माती, कलम रोपे, बेणे, ऊस इत्यादींमार्फत या किडीचा प्रसार होतो. नुकसान 

  • जमिनीवरील पालापाचोळा, इतर कुजके पदार्थ, पपई, केळी, झेंडू, भेंडी व जमिनीवर पडलेली पिवळी पाने (ज्यामध्ये कॅल्शिअम जास्त असते). रात्रीच्या वेळी रोपावस्थेतील पिकांचा जमिनीलगतचा भाग कुरतडून खातात. पिकांचे  शेंडे, पाने, कळ्या, फुले, फळे, साल, नवीन फुटलेले कोंब यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. 
  • शेणखत, सोयाबीन, कांदा, द्राक्ष, फुलकोबी, लसूण घास, टोमॅटो, भोपळा, काकडी, वाल, वांगी, कोबीवर्गीय पिके तसेच सर्व फळभाज्या व पालेभाज्या पिकांमध्ये प्रादुर्भाव दिसून येतो.
  • लपण्याच्या जागा  या किडींना स्वसंरक्षणासाठी शंखांचे कवच असते. दिवसाच्या वेळी बांधावरील वाळलेले, कुजलेले गवत, पाला-पाचोळा, काडी कचरा यांच्या खाली, दगडांच्या सापटीत शंखात लपून बसतात.  एकात्मिक व्यवस्थापन 

  • उन्हाळ्यात जमिनीची खोलवर नांगरट करावी.
  • पिकांच्या मुळाशेजारी, मातीमध्ये गोगलगायींनी घातलेली अंडी गोळा करून नष्ट करावीत.
  • त्यांच्या लपण्याच्या जागा शोधून त्या स्वच्छ व सपाट कराव्यात. शेतालगतचे बांध स्वच्छ करावेत.
  • संध्याकाळी आणि सूर्योदयापूर्वी बाहेर पडलेल्या, झाडावर लपून बसलेल्या गोगलगायी चिमट्याच्या साह्याने गोळा कराव्यात. आणि उकळत्या पाण्यात किंवा साबणाच्या २० टक्के द्रावणात किंवा रॉकेलमिश्रित पाण्यात टाकून माराव्यात. किंवा ३ फूट खोल खड्डा घेऊन त्यात पुरून त्यावर चुन्याची भुकटी टाकून मातीने खड्डा झाकावा.  
  • शेतातील गोगलगायी गोळा करून प्लॅस्टिक किंवा सिमेंटच्या रिकाम्या पोत्यामध्ये भराव्यात. त्यावर चुन्याची पावडर किंवा कोरडे मीठ टाकून पोते शिवून घ्यावे. त्यामुळे गोगलगायी आतमध्ये मरून जातात.
  • छोट्या आकाराच्या गोगलगायींच्या नियंत्रणासाठी, प्रति लिटर पाण्यात २० ग्रॅम मिठाचे द्रावण करून त्याची फवारणी करावी.
  • प्रादुर्भावग्रस्त शेतात किंवा झाडाच्या खोडाजवळ संध्याकाळच्या वेळी मेटाल्डीहाईडच्या गोळ्या हेक्टरी ५ किलो या प्रमाणात टाकाव्यात. गोळ्यांची हाताळणी करताना हातमोजे वापरावेत. तसेच गोळ्या टाकल्यापासून किमान ६ ते ७ दिवस अन्य प्राणी शेतापासून दूर राहतील, याची काळजी घ्यावी.
  • संध्याकाळी शेतामध्ये २० ते २५ फूट अंतरावर गवताचे ढीग करून ठेवावेत. सकाळी त्याखाली लपलेल्या गोगलगायी गोळा करून नष्ट कराव्यात. 
  • एक किलो गूळ १० लिटर पाण्यामध्ये मिसळून द्रावण करावे. तयार द्रावणामध्ये गोणपाटाची पोती भिजवून संध्याकाळी प्रादुर्भावग्रस्त शेतात पसरवून ठेवावीत. 
  • प्रादुर्भाव झालेल्या द्राक्ष बागेमध्ये खोडाशेजारी आच्छादन (मल्चिंग) करणे टाळावे. 
  • गोगलगायींना द्राक्ष वेलींवर चढण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी, १ इंच रुंदीची तांब्याची पट्टी खोडाभोवती गुंडाळावी. किंवा प्लॅस्टिकची पिशवी खोडाभोवती आणि बांबू/सिमेंटच्या उभारलेल्या खांबावर गुंडाळून त्यावर घट्ट ग्रीसचा थर द्यावा.
  • मुख्य शेतातील पिकावर प्रादुर्भाव करण्यापासून रोखण्यासाठी, पिकाच्या सर्व बाजूंनी २ मीटर पट्ट्यात राख पसरावी. त्यावर मोरचूद आणि कळीचा चुना २ः३ या प्रमाणात मिसळून त्याचा राखेवर पातळ थर द्यावा. पाऊस पडत असल्यास किंवा जमीन ओली असल्यास या पद्धतीचा फारसा उपयोग होत नाही.
  • उपद्रव झालेल्या ठिकाणी विषारी आमिषाचा वापर करून प्रभावी नियंत्रण मिळवता येते.
  • विषारी आमिष तयार करण्याची पद्धत 

  • गहू किंवा भाताचा भुसा/कोंडा ५० किलो पुरेशा पाण्यामध्ये भिजत टाकून, त्यामध्ये २ किलो गूळ व २५ ग्रॅम यीस्ट मिसळावे. या मिश्रणात मिथोमिल (४० एसपी) ५० ग्रॅम टाकून हे द्रावण १२ ते १५ तास भिजत ठेवावे. तयार विषारी आमिष संध्याकाळच्या वेळी प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रात (प्रति हेक्टर) पसरून टाकावे. 
  • आमिष खाऊन मेलेल्या गोगलगायी व त्यांची पिल्ले गोळा करावीत. आणि जमिनीत १ मीटर खोल खड्डा घेऊन त्यात पुरून टाकावीत. 
  • हे विषारी आमिष खाऊन मेलेल्या गोगलगायी पाळीव जनावरे, पक्षी किंवा कोंबड्या खाणार नाहीत, याची काळजी घ्यावी.मिथोमिल हे अत्यंत विषारी कीडनाशक असल्यामुळे त्याचा वापर करतेवेळी प्लॅस्टिकचे हातमोजे, गॉगल, मास्कचा वापर करावा.
  • पिकलेली उंबराची फळे, पपया तसेच चिरडून मारलेल्या गोगलगायींचा देखील विषारी आमिष तयार करण्यासाठी उपयोग करता येतो.
  • संपर्क- डॉ. चांगदेव वायळ, ९४०५१८६३६६, (महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी जि.नगर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com