हमाली दरवाढीवरून कोल्हापुरात गूळ सौदे बंद

हमाली दरवाढीबाबत चर्चा करताना शेतकरी, व्यापारी, माथाडी कामगार आणि बाजारसमितीचे प्रतिनिधी
हमाली दरवाढीबाबत चर्चा करताना शेतकरी, व्यापारी, माथाडी कामगार आणि बाजारसमितीचे प्रतिनिधी

कोल्हापूर : खरेदीदार व माथाडी कामगारांच्या हमाली दरवाढीवरून सौदे बंद पडले. सौदे बंद पाडून आमचे नुकसान का करता, असा संतप्त सवाल करीत सोमवारी (ता.१८) गूळ उत्पादकांनी बाजार समितीचे सर्व दरवाजे बंद करून वाहतूक रोखली आणि ठिय्या आंदोलन केले.

बाजार समितीच्या पुढाकाराने खरेदीदार, माथाडी कामगारांच्या चार ते पाच तास सुरू असलेल्या मॅरेथॉन बैठकीनंतरही सायंकाळी पाच वाजेपर्यंत दरवाढीबाबत तोडगा निघू शकला नाही. पोलिसांनी संबंधितांची एकत्रित बैठक घेत अगोदर वाहतूक सुरळीत करा, नंतर चर्चा करा, असे सुनावल्यानंतर दुपारी एकच्यादरम्यान वाहतूक सुरळीत झाली. 

गेल्या काही दिवसांपासून माथाडी कामगार व गूळ व्यापाऱ्यांमध्ये हमाली दरवाढीवरून संघर्ष सुरू आहे. यातून तोडगा म्हणून बाजार समितीच्या मध्यस्थीने व्यापाऱ्यांनी दहा टक्के दरवाढ द्यावी आणि पुन्हा तीन वर्षे माथाडी कामगारांनी वाढ मागू नये, असे पत्र देत सौदे सुरू करण्याबाबत आवाहन केले होते. पण हा निर्णय माथाडी कामगारांना मान्य नव्हता. पुढील तीन वर्षे वाढ नाही ही अट काढावी, अशी त्यांनी मागणी केली. परंतु व्यापाऱ्यांनी मात्र या अटीवरच वाढ देत असल्याचे सांगत ताठर भूमिका घेतली. याचे पर्यावसान सोमवारी गूळ सौदे बंद होण्यावर झाले. गूळ सौदे झाल्याने गूळ उत्पादकांनी गोंधळ घालण्यास प्रारंभ केला.

भगवान काटे, बाबासाहेब पाटील आदींसह गूळ उत्पादकांनी या कृतीचा निषेध नोंदविला. चारही प्रवेशद्वारांवर गुळाची वाहने लावून वाहतूक बंद करण्यात आली. अचानक वाहतूक बंद केल्याने भाजीपाल्यासह कांदा बटाट्याची वाहतूकही ठप्प झाली. याचदरम्यान शाहूपुरी मर्चंटस असोसिएशन येथे व्यापाऱ्यांनी बैठक घेतली. सकाळी अकराच्या सुमारास पोलिस दाखल झाल्यानंतर त्यांनी बाजार समितीत सर्व घटकांना बोलावून चर्चा घडवून आणली. 

शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड, बाजार समितीचे सभापती बाबासाहेब लाड, सचिव मोहन सालपे, शाहूपुरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जसवंत शहा, भगवान काटे, माथाडी कामगार प्रतिनिधी बाबूराव खोत यांच्यात बैठक झाली. अडेलतट्टूपणाची भूमिका घेत सर्व घटक आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने श्री. कटकधोंड यांनी आंदोलनकर्त्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. जिल्हा पोलिसप्रमुख अभिनव देशमुख यांच्याशी चर्चा केली. कोणताही निर्णय घ्या, परंतु वाहतूक सोडा, असे आवाहन त्यांनी केले.

सौदे मंगळवारपासून (ता.१९) सुरू करण्याच्या आश्‍वासनानंतर गूळ उत्पादकांनी आंदोलन मागे घेतले तरीही बाजार समितीत चर्चा सुरूच होती. दहा टक्के वाढीचे पत्र व्यापाऱ्यांनी द्यावे, यानंतर गुढीपाडव्याला परत बैठक घेऊन पुढील निर्णय घ्यावा, असे आवाहन बाजार समितीने केले. व्यापाऱ्यांनी पत्र देतो. परंतु तीन वर्षे वाढीची अट तशीच राहणार, असे सांगत याला मोडता घालण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी पाचपर्यंत तरी याबाबत समाधानकारक तोडगा निघाला नाही. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com