कोल्हापुरात गूळ सौदे पुन्हा बंद 

गूळ पॅकिंग बॉक्स वजनाच्या कारणावरून येथील शेती उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (ता.१५) व्यापाऱ्यांनी पुन्हा गूळ सौदे बंद पाडल्याने लाखोंची उलाढाल ठप्प झाली. प्रामुख्याने एक व अर्धा किलो गुळाचे सौदे बंद पडले.
Jaggery deals closed again in Kolhapur
Jaggery deals closed again in Kolhapur

कोल्हापूर : गूळ पॅकिंग बॉक्स वजनाच्या कारणावरून येथील शेती उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (ता.१५) व्यापाऱ्यांनी पुन्हा गूळ सौदे बंद पाडल्याने लाखोंची उलाढाल ठप्प झाली. प्रामुख्याने एक व अर्धा किलो गुळाचे सौदे बंद पडले. दहा किलो गुळाचे सौदे मात्र नियमित झाले. वाद न मिटल्याने दुपारपर्यंत गुळाने भरलेल्या शेकडो गाड्या बाजार समितीत थांबून होत्या. बाजार समितीचे सचिव जयवंत पाटील व अन्य संचालकांबरोबर दुपारी उशिरा पर्यंत बैठक सुरू होती. मात्र तोडगा निघाला नव्हता. 

शाहू मार्केट यार्डात गूळ सौद्यामध्ये गुळा सोबत त्याला पॅकिंग केलेल्या बॉक्सचे वजन धरावे, त्याचे पैसेही व्यापाऱ्यांनी द्यावेत. या मागणीवरून व्यापारी-शेतकरी यांच्यात हंगामाच्या सुरुवातीपासूनच वाद सुरू आहे. बाजार समितीने गुळाच्या बॉक्सचे वजन धरावे, अशी सूचना व्यापाऱ्यांना केली होती. तसा निर्णय ही झाला होता. पण व्यापाऱ्यांनी हा निर्णय न मानल्याने बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून कुरबूर सुरू होती. व्यापाऱ्यांनी बॉक्स पाहिजे असेल तर बॉक्स सहित वजन धरावे किंवा शेतकऱ्यांना बॉक्स परत द्यायचे असतील तर बॉक्सचे वजन कमी करून शेतकऱ्यांच्या गुळाचे वजन द्यावे, असा निर्णय महिन्यापूर्वी झाला होता.  गूळ उत्पादक शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर गूळ रव्याच्या बॉक्सचे वजन १८ किलो ५०० ग्रॅम गृहीत धरणे, शेतकऱ्यांनी दर वेळी नवीन बॉक्स वापरणे, असाही निर्णय झाला होता. जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. अशासकीय प्रशासक मंडळाचे सदस्य सूर्यकांत पाटील यांनी समन्वयकांची भूमिका पार पाडली होती.  बाजार समितीने व्यापाऱ्यांकडून हा निर्णय कबूल करून घेतला होता, परंतु अनिच्छेने निर्णयाला मंजुरी दिलेल्या व्यापाऱ्यांनी सोमवारी (ता.१५) मात्र या निर्णयाविरोधात भूमिका घेत सौदे सुरू न करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताच बाजार समितीचे पदाधिकारी सौद्याच्या ठिकाणी आले. परंतु वाद मिटत नसल्याने एक किलो व अर्धा किलोचे गूळ सौदे तसेच प्रलंबित राहिले. दहा किलोचे सौदे मात्र व्यापाऱ्यांनी पूर्ण केले. दुपारनंतर संबंधित घटकांची बाजार समिती पुन्हा बैठक सुरू होती दुपारी तीन वाजेपर्यंत यातून तोडगा निघाला नव्हता.  गुजरातच्या बाजारपेठेत गूळ पाठवताना तूट असल्याने व्यापारी बॉक्सचे वजन कमी करून गुळाचा हिशोब शेतकऱ्यांना देत आहेत. याला शेतकऱ्यांचा विरोध आहे. व्यापारी शेतकऱ्याकडून बॉक्स घेतातच आणि तोच बॉक्स शेतकऱ्यांना परत विकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना तोटाच होतो, असा आरोप गूळ उत्पादकांचा आहे. गेल्या महिन्यापासून बाजार समितीने सातत्याने विविध घटकांच्या मध्यस्थीने बैठका घेऊन हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला परंतु शेतकरी व व्यापारी यांच्यात अंतर्गत धुसफूस सुरूच राहिल्याने सौदे बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीत गुळाची आवक चांगली होत आहे. या पार्श्वभूमीवर सौद्यात सातत्याने अडचणी येत असल्याने गूळ उत्पादक हतबल झाले आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com