नाशिक : जलयुक्त शिवार योजनेत २०१६-१७ या वर्षी निवडलेल्या नाशिक विभागातील ९०० पैकी तब्बल ९६ टक्के म्हणजेच ८६१ टंचाईग्रस्त गावे जलपरिपूर्ण झाली आहेत.
जलयुक्त शिवार अभियान आणि नरेगा या योजनांच्या अंमलबजावणी आणि प्रगतीच्या संदर्भात विभागीय आयुक्तालयात मावळते विभागीय आयुक्त महेश झगडे बोलत होते. या वेळी त्यांनी यासंदर्भात माहिती दिली. या वर्षीच्या आराखड्यातील नियोजित कामे सरकारने दिलेल्या मुदतीच्या आत पूर्ण करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. जलयुक्त शिवार अभियानामुळे टंचाईग्रस्त गावांमधील नागरिकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाल्याचा दावा त्यांनी या वेळी केला.
गेल्या वर्षी नाशिक विभागातील ९०० गावांचा समावेश या योजनेत करण्यात आला होता. या गावांत प्रस्तावित २५ हजार ८०५ कामांपैकी ९० टक्के अर्थात २३ हजार ५३५ इतकी कामे पूर्ण झाली. ८६१ गावांची टंचाईतून मुक्तता झाली. पूर्ण झालेल्यापैकी २१,१३६ कामांचे जिओ टॅगिंगचे कामही पूर्ण झाले आहे.
या कामांमुळे नाशिक विभागात १ लाख ४१ हजार ८३३ टीसीएम पाणीसाठा निर्मिती झाली असून, त्याद्वारे २ लाख ३२ हजार हेक्टर क्षेत्रास संरक्षित सिंचनासाठी एक पाणी देता येणे शक्य होणार आहे. या कामांवर ४९८ कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे.
पेयजलसंबंधी बळकटीकरणाच्या कामांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यांची फेरतपासणी प्रांताधिकाऱ्यांमार्फत केली जाणार आहे. कमी पावसाच्या क्षेत्रात मजगीच्या कामांना प्रतिबंध घालण्याचा निर्णय घेतल्याचे या वेळी झगडे यांनी सांगितले.