नगरला पहिल्यांदाच जानेवारीत साडेतीनशे टॅंकर 

नगरला पहिल्यांदाच जानेवारीत साडेतीनशे टॅंकर 
नगरला पहिल्यांदाच जानेवारीत साडेतीनशे टॅंकर 

नगर : जिल्ह्यात दुष्काळाचे सावट आहे. यंदा पावसाने दडी मारल्याने गावशिवारात मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवत आहे. जिल्ह्यातील २७६ गावे आणि १४०८ वाड्या-वस्त्यांतील सहा लाख सात हजार ७४९ लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे पिण्याचा पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल ३४० टॅंकर धावत आहेत. पाण्याचा आणि सधन जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नगर जिल्ह्यामध्ये डिसेंबर-जानेवारीत तब्बल साडेतीनशे टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची आणि जनावरांचा चाऱ्यांचाही गंभीर प्रश्‍न निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

नगर जिल्ह्यामधील सर्वच भागांत यंदा दुष्काळीची तीव्रता जाणवत आहे. पाऊस नसल्याने पाणी साठवण झाले नाही. त्याचा परिणाम म्हणून मार्च, एप्रिलमध्ये लागणारे टॅंकर यंदा डिसेंबरमध्ये लागू लागले आहेत. सध्या जिल्हाभरात सुमारे ३४० टॅंकरने पाणीपुरवठा केला जात असून मागणीतही झापाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव, राहुरी, नगर, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड, श्रीगोंदे दहा तालुक्‍यांत प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा टॅंकरद्वारे करण्यात येत आहे. 

जिल्ह्यात सर्वाधिक ११८ पाथर्डी तर सर्वात कमी राहुरी येथे एक टॅंकर सुरू आहे. खरीप हंगाम पाठोपाठ रब्बीचा हंगामही वाया गेला. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे जिल्ह्यातील २४६ गावांचा भूगर्भाचा जलस्तर तीन मीटरने घटला आहे. जिल्ह्यात अधिकृत नोंदणी असलेल्या विहिरींची संख्या दोन लाखांपेक्षा अधिक आहे. त्यापैकी ९० टक्के विहिरींनी आता तळ गाठला आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त शिवारात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून टॅंकर सुरू करण्यात आले. दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. स्राेत कोरडे पडू लागले असल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न वरचेवर गंभीर होत आहे. 

प्रशासनाने केलेल्या पाणी नियोजनात जनावरांच्या पाण्याची उपाययोजना नसल्याने जिल्ह्यामध्ये जनावरांच्या पाण्याचाही प्रश्‍न वरेचवर गंभीर होत आहे. नगर जिल्ह्याने याआधीही दुष्काळाची तीव्रता अनुभवलेली आहे. मात्र, पाण्याचा आणि सधन जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नगर जिल्ह्यामध्ये डिसेंबर-जानेवारीत तब्बल साडेतीनशे टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची आणि जनावरांचा चाऱ्यांचीही गंभीर प्रश्‍न निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अजून सहा महिने जायचे असल्याने शेतकरी, नागरिकांत चिंता व्यक्त केली जात आहे. 

तालुकानिहाय टॅंकर संख्या : संगमनेर-३१, कोपरगाव-३, राहुरी-१, नगर-२३, पारनेर-६६, पाथर्डी-११८, शेवगाव-३१, कर्जत-३२, जामखेड-२०, श्रीगोंदे-१५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com