आमदार फोडण्याच्या नादात चंद्रकांतदादा अलमट्टीचा आढावा घ्यायला विसरले : जयंत पाटील

लाखोंच्या उद्ध्वस्त झालेल्या संसाराला जबाबदार कोण? रेस्क्यू ऑपरेशन मदत वेळेत पोचली का नाही? याचा सरकारने खुलासा द्यावा. भविष्यात अशी दुर्घटना घडू नये यासाठी काय उपाययोजना केल्या, हेही जाहीर करावे. - जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी.
जयंत पाटील
जयंत पाटील

इस्लामपूर, जि. सांगली ः राज्यातील आमदार फोडण्याच्या नादात मंत्री चंद्रकांत पाटील यांना अलमट्टी धरणाचा आढावा घ्यायला वेळच मिळाला नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील येथे केली. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे कर्नाटक व महाराष्ट्र या दोन राज्यांची संयुक्त समिती नेमून अलमट्टीतून पाण्याच्या विसर्गाच्या मुद्द्यावर योग्य निर्णय घेतला जाईल, असे विधान केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी अशी समिती आधीच नेमली असल्याचे सांगून इकडे आमदार फोडण्याच्या नादात त्यांना अलमट्टीसाठी वेळच मिळाला नाही, अशी टीका केली.

श्री. पाटील म्हणाले, की अलमट्टी धरणाचा विषय जुना आहे. शासन त्याबाबत गंभीर नाही. कोयनेतून योग्य वेळी विसर्ग न केल्याने महापुराचा अनेकांना फटका बसला. अतिवृष्टीच्या पहिल्या दोन दिवसांत विसर्गाच्या सूचना दिल्या असत्या तर दुर्घटना टळली असती. ज्यांना महापुरामुळे विस्थापित व्हावे लागले, त्या सर्वांना सरकारने मदतीचा हात द्यायला हवा. खासदार शरद पवार यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत त्यांनी दिलेली आश्वासने अद्याप पाळली नाहीत. आम्हाला राजकारण करायचे नाही, पण लोकांना होणारा त्रास, नुकसान महत्त्वाचे आहे.

तातडीने पूरग्रस्त भागातील पंचनामे करून पूरग्रस्तांना नुकसानभरपाई द्यावी. अतिवृष्टी व पुराच्या पाण्याने पडलेली घरे सरकारने बांधून द्यावीत. ज्या घरांना भेगा पडल्या आहेत, कच्च्या विटा - मातीची आहेत, त्यांनाही घरे बांधून द्यावीत. त्याचबरोबर शेतकऱ्यांना ऊस, केळी, द्राक्षे, डाळिंब या पिकांना एकरी एक लाख तर सोयाबीन, हळद, आले, भुईमुगास एकरी ४० हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी. जनावरांसाठी ७० हजारांची भरपाई हवी. पूरपट्ट्यातील व्यापारी, दुकानदार, टपऱ्यांसह ज्यांचे नुकसान झाले आहे, त्याची मोजदाद करून त्यांना योग्य तो मोबदला मिळायला हवा. पूरग्रस्तांना होणाऱ्या मदतवाटपात कोणावरही अन्याय होऊ नये. अनेक ठिकाणच्या तक्रारी येताहेत, त्याची दखल घ्यावी, अशी मागणी श्री. पाटील यांनी केली.

बिचुद, डिग्रज भागात फिरताना तिथल्या पूरग्रस्तांच्या अडचणी ऐकून मुख्यमंत्री फडणवीस यांना संपर्क साधला असता, आपल्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. संबंधितांना सूचनाही दिल्या आहेत, असे उत्तर त्यांनी दिले, पण प्रत्यक्षात यातले काहीच झाले नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. सध्या निवडणूक तोंडावर असल्याने काहीच नाही म्हणायचे नाही, असे सुरू असल्याची टीका त्यांनी केली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com