नगर ः ग्रामीण भागात मजुरांना रोजगार मिळावा, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (नरेगा) नगर जिल्ह्यात ६४२४ विहिरींची कामे सुरू आहेत. आतापर्यंत ५३९९ कामे पूर्ण झाली आहेत, तर १०२५ कामे अपूर्ण असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातून देण्यात आली.
ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार मिळण्यासह वैयक्तिक योजनांचा लाभ मिळावा, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (नरेगा) विहिरींची कामे केली जातात. उन्हाळ्यात या कामाला गती येत असते. यंदा नव्याने केलेल्या नरेगाच्या वार्षिक आरखड्यात वैयक्तिक योजनांत विहिरींच्या कामाला प्राधान्य दिले आहे.
सध्या जिल्हाभरात मागील वर्षी मंजूर झालेली कामे पूर्ण करण्यावर ग्रामपंचायत विभाग भर देत आहे. सध्या जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ६४२४ विहिरींची कामे सुरू आहेत. यंदाचा आराखडाही मंजूर केलेला असून, नव्या आराखड्यानुसार १६ कामे पूर्ण झाली असून, २२ कामे सुरू आहेत. आतापर्यंत ५३९९ विहिरींची कामे पूर्ण झालेली असून, एक हजार २४ विहिरींची कामे अपूर्ण आहेत. अपूर्ण कामे पूर्ण करण्यावर भर दिला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
तालुकानिहाय सुरू कामे (कंसात पूर्ण झालेली कामे) ः अकोले ः ५५६ (४६१), जामखेड ः ७४७ (६४४), कर्जत ः ६१६ (५३८), कोपरगाव ः ४२८ (३४१), नगर ः २८० (२१८), नेवासा ः १९९ (१२०), पारनेर ः ९९३ (८५९), पाथर्डी ः ८२० (६९२), राहाता ः २४३ (२४२), राहुरी ः २०२ (१३५), संगमनेर ः ३७३ (३०४), शेवगाव ः ५२८ (४८०), श्रीगोंदा ः ३८० (३१८), श्रीरामपूर ः ५९ (४७).