मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होणार?

मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होणार?
मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होणार?

पुणे : मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे हिमालयाच्या पायथ्याकडे स्थिरावला अाहे. राजस्थानमध्ये हवामान कोरडे होत असल्याने नैर्ऋत्य मोसमी वारे (माॅन्सून) माघारी फिरण्यास पोषक हवामान तयार होऊ लागले आहे. त्यामुळे देशातून माॅन्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  साधारणत: १ सप्टेंबर रोजी पश्‍चिम राजस्थानमधून माॅन्सून परत फिरतो. यंदा मात्र मॉन्सूनचा परतीचा प्रवास लांबला असून, १० सप्टेंबर उलटूनही माॅन्सून माघारी फिरलेला नाही. मात्र, माॅन्सूनचा आस उत्तरेकडे स्थिरावला असून त्याचा पूर्व भागही ईशान्य राज्यांकडे सरकला आहे.  १३ ते १५ सप्टेंबर राेजी हिमालयाच्या पश्‍चिम भागात पश्‍चिमी चक्रावात तयार होण्याची शक्यता आहेत. तर १२ सप्टेंबरपासून पश्‍चिम राजस्थान आणि १३ सप्टेंबरपासून पूर्व राजस्थानात कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. गतवर्षी २७ सप्टेंबर रोजी मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू केला होता. तर २५ अॉक्टोबर रोजी संपूर्ण देशातून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले होते.  राज्यात निरभ्र आकाश असल्याने तापमानात वाढ होऊ लागली आहे. सोमवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जळगाव, बुलडाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर येथे तापमान ३३ अंशांवर तर मालेगाव, सोलापूर, डहाणू, नागपूर, यवतमाळ येथे तापमान ३२ अंशांवर गेले आहे. तर राज्यात ढगाळ हवामानामुळे उकाड्यातही वाढ झाली अाहे.  सोमवारी (ता. १०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, कसांत किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २९.६ (१७.५), जळगाव ३३.२ (२४.०), कोल्हापूर २९.३(१९.७), महाबळेश्‍वर १९.८(१६.०), मालेगाव ३२.०(२०.४), नाशिक २८.५(१७.५), सांगली ३०.४(१७.९), सातारा ३०.१(१७.१), सोलापूर ३२.७ (२०.७), सांताक्रुझ ३१.१(२३.८), अलिबाग ३१.२(२३.४), रत्नागिरी २९.३(२२.६), डहाणू ३२.०(२३.७), आैरंगाबाद ३१.० (१८.६), परभणी ३२.५(१९.९), नांदेड - (२१.०), अकोला ३३.६(२०.८), अमरावती ३१.४(२०.८), बुलडाणा ३३.२ (१९.३), चंद्रपूर ३३.२ (२२.२), गोंदिया ३०.८(२१.८), नागपूर ३२.४(२१.१), वर्धा ३१.७(२२.५), यवतमाळ ३२.० (२०.४). तापमान वाढण्याची शक्यता मॉन्सूनला जोर राहिला नसल्याने राज्यात पाऊस थांबला आहे. राज्यात मुख्यत: कोरडे हवामान राहणार असल्याने तापमानात १ ते २ अंशाची वाढ होण्याची शक्यता आहे. तर बुधवारपर्यंत (ता. १२) मराठवाड्यात कोरड्या हवामानाचा, शुक्रवारपर्यंत (ता. १४) उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com