पुणे ः सोयाबीन, बाजरीचे न उगवलेल्या बियाण्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून बोगस बियाणे पुरवणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. झालेल्या खर्चाची वसुली कंपन्यांकडून करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अन्यथा १० जुलैला कृषी आयुक्तांच्या दालनातच बोगस बियाण्यांची होळी पेटवून आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे नगर जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी कृषी आयुक्त सुहास दिवसे यांना दिला आहे.
शेतकऱ्यांनी खरीप हंगामात सोयाबीन, बाजरी बियाण्यांची पेरणी केली होती. मात्र, बियाणेच बोगस व निकृष्ट निघाल्याने उगवणच झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली असून, आर्थिक नुकसान होऊन हंगाम वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रहारच्या वतीने नित्कृष्ट बियाणे पुरवठा करणाऱ्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी सोमवारी (ता. २९) कृषी आयुक्त श्री. दिवसे यांना निवेदन देण्यात आले होते. या वेळी पुणे जिल्हा प्रहार सेवक संतोष साठे, प्रकाश वरे उपस्थित होते.
कृषी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या खरीप हंगाम सुरू झाल्याने नगर, पुणे यासह राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपापल्या भागातील कृषी सेवा केंद्रचालकांकडून सोयाबीन, बाजरी, कापूस यांसारख्या पिकांचे बियाणे खरेदी करून पेरणी केली होती. पेरणी करून १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला तरी बियाणे उगवण झालेली नाही.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.