यवतमाळ ः पावसाळ्यापूर्वी कापूस विकला जाईल किंवा नाही याची चिंता शेतकऱ्यांना आहे. मात्र, कळंब तालुक्यातील नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस ५ जूनपर्यंत खरेदी होईल, असे नियोजन करण्यात आल्याची माहिती मुंबई बाजार समितीचे संचालक तसेच कळंब बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री. देशमुख म्हणाले की, शहरात सध्या दोन जिनींग सुरू आहेत. परंतु त्यांनी कापूस खरेदीसाठी अपेक्षीत सहकार्य केले नाही. या दोन्ही जिनर्सकडून अत्यल्प कापसाची खरेदी करण्यात आली. अजूनही नोंदणी केलेल्या हजारो शेतकऱ्यांचा कापूस विकायचा आहे. खरेदीची हीच गती कायम राहिली असती तरी बहुतेक शेतकऱ्यांचा कापूस विकायचा राहून गेला असता. बाजार समिती संचालक मंडळाने वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून कापूस खरेदीची गती वाढविण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे आता कळंब तालुक्यात नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना नंबरप्रमाणे यवतमाळ व राळेगाव येथेही आपला कापूस विकता येणार आहे. ठरवून दिलेल्या कापसाची खरेदी न केल्यास अथवा जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्यास संबंधित जिनिंगवर कारवाई होणार आहे. यासोबतच कळंब येथील जिनिंगकडून निर्धारीत कापसाची खरेदी न झाल्यास किंवा खरेदी बंद पाडण्याचा प्रयत्न केल्यास, परवाना निलंबनाचा प्रस्ताव पाठविण्यात येईल. काही शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी अद्यापही नोंदणी केलेली नाही. त्यांनी ती तत्काळ करावी, अन्यथा भविष्यात त्यांची आर्थिक पिळवणूक होण्याची शक्यता आहे.
यावेळी पणन महासंघाचे संचालक सुरेश चिंचोळकर, बाजार समिती संचालक आनंद जगताप, चंद्रशेखर चांदोरे, खरेदी विक्री संघाचे सभापती बबलू पाटील, योगेश धांदे, सचिव तुषार देशमुख उपस्थित होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.