यवतमाळ जिल्ह्यातील कलिंगड उत्पादक संकटात

मागील पाच वर्षांपासून कलिंगडाची लागवड करीत आहे. या माध्यमातून विक्रमी उत्पादनही घेतो. यंदा शास्त्रोक्त पद्धतीने सात एकरांवर कलिंगडाची लागवड केली. त्यासाठी पाच लाखांचा खर्च आला. परंतु, मोठ्या प्रमाणात फळगळ होत असल्यामुळे केवळ पन्नास हजारांचे उत्पादन होईल, अशी स्थिती आहे. या गंभीर संकटामुळे भविष्यात जिल्ह्यात कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल, अशी शक्यता आहे. - मिथुन लोंढे,प्रगतिशील शेतकरी, पिंपरी (जि. यवतमाळ)
यवतमाळ जिल्ह्यातील कलिंगड उत्पादक संकटात
यवतमाळ जिल्ह्यातील कलिंगड उत्पादक संकटात

यवतमाळ  : अलीकडच्या काळात जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचा तोट्यातील व्यवसाय नफ्यात आणला आहे. हजारो प्रयोगशील शेतकऱ्यांनी मल्चिंग तंत्रज्ञानाचा वापर करून शेतात कलिंगडासारखे पीक घेणे सुरू केले. मात्र, या वर्षी कलिंगडाची फळे गळून पडत असल्याने शेतकरी अडचणीत आहेत. याला केवळ निकृष्ट दर्जाचे बियाणेच जबाबदार असल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

मागील चार-पाच वर्षांपासून शेतकरी मोठ्या प्रमाणात कलिंगड व खरबुजाची शेती करीत आहेत. या पिकांमुळे त्यांना चांगल्याप्रकारे नफा मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी या पिकाकडे वळले. दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न या पिकाच्या माध्यमातून मिळते. त्यामुळे यंदा शेकडो शेतकऱ्यांनी कलिंगडाची लागवड केली. सर्वसाधारणपणे नोव्हेंबरमध्ये आपल्या भागात पिकाची लागवड केली जात असते. ९० दिवसांनी याला साधारणतः तीन ते पाच किलो वजनाचे फळ लागते. परंतु, यावर्षी ९० दिवसांचा कालखंड लोटूनसुद्धा वेलीला केवळ ५० ते १०० ग्रॅम वजनाचे कलिंगड लागली. त्यांचे वजन वाढत नसून, मोठ्या प्रमाणात फळगळ होत आहे.

दरवर्षीप्रमाणे शास्त्रोक्त पद्धतीने लागवड करूनही कलिंगड का गळत आहेत, या चिंतेत शेतकरी आहेत. ही फळगळ केवळ यवतमाळ जिल्ह्यातच होत असून, इतर जिल्ह्यात मात्र, कलिंगडाचे उत्पादन चांगले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील फळगळ ही हवामानाच्या बदलामुळे होत नसून, सदोष बियाण्यांमुळे होत आहे, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

सर्वसाधारणपणे आपल्या भागात ज्या कंपन्या बियाणे पुरवठा करतात, त्याच कंपन्या शेजारील जिल्ह्यातही पुरवठा करतात. शेतकऱ्यांनी लगतच्या जिल्ह्यात चौकशी केली. त्या वेळी या कंपनीचे बियाणे त्या ठिकाणी चांगले निघाले. परंतु, यवतमाळ जिल्ह्यात पुरविल्या गेलेला लॉट हा सदोष  असल्यामुळे फळगळ होत असल्याचा शेतकऱ्यांचा अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com