कर्नाटकव्याप्त प्रदेश पुन्हा महाराष्ट्रात आणणारच ः मुख्यमंत्री ठाकरे

संपूर्ण महाराष्ट्र सीमावासींच्या पाठीशी असून, न्यायालयात या प्रकरणात ठाम बाजू मांडण्याची भूमिका राज्य शासनाची असल्याचे सांगून कर्नाटकव्याप्त महाराष्ट्राचा प्रदेश पुन्हा महाराष्ट्रात आणण्याचा ठाम निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
Karnataka will be brought back to Maharashtra: Chief Minister Thackeray
Karnataka will be brought back to Maharashtra: Chief Minister Thackeray

मुंबई : सीमावासीयांच्या पिढ्यान् पिढ्या कर्नाटक सरकारच्या अत्याचाराला सामोऱ्या जात असून, त्याविरुद्ध पूर्वीप्रमाणेच एकजूट करणे आवश्यक आहे. संपूर्ण महाराष्ट्र सीमावासींच्या पाठीशी असून, न्यायालयात या प्रकरणात ठाम बाजू मांडण्याची भूमिका राज्य शासनाची असल्याचे सांगून कर्नाटकव्याप्त महाराष्ट्राचा प्रदेश पुन्हा महाराष्ट्रात आणण्याचा ठाम निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

‘रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में’ तसेच ‘बेळगाव, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ या सीमावासीयांच्या उत्स्फूर्त घोषणांत मुख्यमंत्री श्री. ठाकरे, ज्येष्ठ‍ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद; संघर्ष‍ आणि संकल्प’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या या कार्यक्रमास सीमा भागातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सीमा भागाचे समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार अरविंद सावंत आदी उपस्थित होते.

या वेळी प्रास्ताविकात सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांनी या पुस्तकाच्या निर्मितीमागील भूमिका स्पष्ट केली. सीमाप्रश्‍नी राजकीय, सामाजिक चळवळ विचारमंथनाला गती मिळावी. तेथे मराठी भाषेतून शिक्षणाची सोय, शाळा, महाविद्यालये यासाठीच्या शासकीय प्रयत्नांना गती यावी यासाठी राज्य शासनाचा सीमाकक्ष प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. पुस्तकाचे संपादक डॉ. दीपक पवार यांनी हे पुस्तक सीमाभागासह संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे हत्यार व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

न्यायालयात ठाम भूमिका मांडावी ः शरद पवार महाजन आयोगाची स्थापना, मधू मंगेश कर्णिक यांच्यासह सीमाप्रश्‍नातील न्यायालयीन प्रकरणासाठी पुरावे जमा करण्यासाठी केलेले प्रयत्न, महाराष्ट्र एकीकरण समितीची स्थापना तसेच सत्याग्रह, त्यात राजकीय नेतृत्वाने भोगलेला तुरुंगवास आदींचा उल्लेख करून श्री. पवार पुढे म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयातील लढा हे सीमावादातील शेवटचे शस्त्र असून, आता आपण अंतिम पर्वाच्या दिशेने आहोत. तेथे राज्याची भूमिका ठामपणे मांडावी लागेल आणि त्यासाठी मुख्यमंत्री श्री. ठाकरे हे स्वत: लक्ष घालत आहेत.

हा भाग केंद्रशासीत घोषित करा ः मुख्यमंत्री एखादा प्रश्‍न न्यायालयात असेपर्यंत परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवली पाहिजे. परंतु कर्नाटक सरकारने बेळगावचे नामांतर, उपराजधानीचा दर्जा तसेच तेथे विधानसभेची उभारणी करून न्यायालयाचा अवमान करण्याचे काम केले आहे. त्यामुळे जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात सीमावादाचा प्रश्‍न सुटत नाही तोपर्यंत हा भाग केंद्रशासीत केला जावा, अशी भूमिका या वेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मांडली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com