मिश्रखते आणि एसएसपीवर लक्ष ठेवण्याचे आयुक्तांचे आदेश

मिश्रखते आणि एसएसपीवर लक्ष ठेवण्याचे आयुक्तांचे आदेश
मिश्रखते आणि एसएसपीवर लक्ष ठेवण्याचे आयुक्तांचे आदेश

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार खताचा पुरवठा होण्यासाठी घाऊक विक्रेत्यांकडून केल्या जाणाऱ्या खत साठ्यांची तपासणी करावी. यात दाणेदार मिश्र खते व एसएसपीच्या गुणवत्तेची जास्त काळजी घ्यावी, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. मिश्र खतांमध्ये शेतकऱ्यांना दर्जेदार मालाचा पुरवठा होत नसून त्यातून जमिनीचीदेखील हानी होते, असे कृषी विभागाचे म्हणणे होते. त्यामुळेच दोन वर्षांपूर्वी काही दुय्यम मिश्र खत उत्पादक कंपन्यांचे उत्पादन परवाने निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर राज्यातील सर्वच कंपन्यांची दुय्यम मिश्र खतांची विक्री थांबविण्याचे आदेश तत्कालीन कृषी आयुक्तांनी दिले होते.  "दोन वर्षांपूर्वी ६४ कंपन्यांचे मिश्र खतांचे परवाने निलंबित केले गेले होते. तसेच खत उत्पादक कंपन्यांच्या १०:५:१० व ८:६:६ या दुय्यम मिश्र खतांच्या ग्रेडची विक्री बंद करण्यात आली. शेतकऱ्यांना चांगली मिश्र खते मिळण्यासाठी चालू खरिपातदेखील गुणवत्ता तपासणी अभियान कडक राबविले जाईल. दाणेदार मिश्र खते आणि एसएसपीच्या उत्पादन स्थळावर थेट निरीक्षकांची नियुक्ती करण्याचे आदेशदेखील आयुक्तांनी दिलेले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.  राज्यात खत नियंत्रण कायदा १९८५ मधील तरतुदीनुसार खताचा किरकोळ व घाऊक परवाना देण्यासाठी परवाना प्राधिकारी घोषित करावा लागतो. सध्या जिल्हा परिषदेचा कृषी विकास अधिकारी असे परवाने वाटतात. मात्र, एकापेक्षा व जास्त जिल्ह्यांमध्ये खताचे विक्री केंद्र किंवा गोदाम असल्यास कृषी आयुक्तांलयातील गुणनियंत्रण संचालक मच्छिंद्र घोलप यांच्याकडून विक्रेत्यांना परवाने दिले जातात.  "शेतकऱ्यांना शिफारस नसलेल्या खतांची साठवणूक व विक्री करण्याचे प्रकार काही ठिकाणी उघड झालेले आहेत. खत साठणुकीच्या स्थळावर साठ्याची अद्ययावत माहितीदेखील ठेवली जात नाही. त्यामुळे अशा गोदामांची नियमित तपासणी झाल्यास शेतकऱ्यांची फसवणूक टाळता येईल. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत खताच्या प्रत्येक साठवणूक केंद्रासाठी स्वतंत्र निरीक्षक नियुक्त करण्याचे आदेश आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी दिले आहेत, असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

 खत निरीक्षकांच्या कामाची फेरतपासणी होणार  राज्यातील खताच्या साठवणूक व विक्री केंद्रांची प्रत्येक महिन्याला तपासणी करण्याची जबाबदारी गुण नियंत्रण निरीक्षकांवर सोपविण्यात आलेली आहे. मात्र, काही निरीक्षकांची मिलिभगत होण्याची शक्यता असल्यामुळे या गुण नियंत्रण तंत्र अधिकारी व कृषी विकास अधिकाऱ्याने देखील अचानक साठ्यांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. किमान २० टक्के फेरतपासणी करून कृषी आयुक्तालयाकडे अहवाल सादर करण्याचे बंधन देखील टाकण्यात आले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com