डाळ उद्योग अडचणीत; ३० कोटींचा फटका

कोरोनाच्या संकटात खानदेशातील डाळ उद्योग पुरता अडकला आहे. निर्यात, प्रक्रिया ठप्प आहे. या ३८ दिवसात उद्योगाला सुमारे ३० कोटींचा फटका बसला आहे.
डाळ उद्योग अडचणीत; ३० कोटींचा फटका
डाळ उद्योग अडचणीत; ३० कोटींचा फटका

जळगाव : कोरोनाच्या संकटात खानदेशातील डाळ उद्योग पुरता अडकला आहे. निर्यात, प्रक्रिया ठप्प आहे. या ३८ दिवसात उद्योगाला सुमारे ३० कोटींचा फटका बसला आहे. मालवाहतूक नाही, मजूर नाही, कामगार नाही आणि कच्चा मालही नाही अशा कोंडीत डाळ उद्योग कोंडीत सापडला आहे.  डाळ निर्यातीत जिल्हा आघाडीवर आहे. काही वर्षांपूर्वी या जळगाव जिल्ह्यात हा उद्योग समृद्ध होता. जवळपास दोनशे प्रक्रिया उद्योग होते, ते औद्योगिक पीछेहाटीमुळे ८० ते ९० वर आले. यातच कोरोनाचे संकट व लॉकडाउनमुळे डाळ उद्योगाची चाके थांबली आहेत. निर्यातही थांबली. जवळपास पाच आठवडे निर्यात बंद असल्याने २५ ते ३० कोटींचा फटका या उद्योगांना बसला आहे. डाळींचा जीवनावश्‍यक वस्तूंमध्ये समावेश होत असला, तरी वाहतूक व्यवस्था व कामगार उपलब्ध नसल्याने हा उद्योग ठप्प आहे. आता काही अंशी निर्यात सुरू झाली असली, तरी वाहतूक व मजुरांची अडचण कायम आहेच. शिवाय, कच्च्या मालाची उपलब्धताही नाही. कारण, वाहतूकच बंद असल्याने कच्चा माल नाही, त्यामुळे प्रक्रिया कशी करणार? या अडचणी दूर केल्यास डाळ उद्योगाची थांबलेली चाके पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकतील.  प्रतिक्रिया...

डाळ उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल जहाजाद्वारे मुंबईहून येतो. पण, मालवाहतूक पूर्णपणे सुरू न झाल्याने कच्च्या मालाची अडचण आहे. निर्यात मागील चार-पाच आठवडे बंद होती. जवळपास वीस कोटींच्या डाळींची निर्यात आपण करू शकलो नाही. आता काही प्रमाणात निर्यात सुरू झाली आहे. कुरिअर सेवा, जहाजाद्वारे निर्यात काही अंशी सुरू झाली. आगामी काळात ती वाढविली जावी. डाळ उद्योगात काम करणारे अनेक कामगार होळीच्या सणाला आपापल्या गावी निघून जातात. नंतर परत येऊन ते काम करतात. मात्र, होळीनंतर लॉकडाउन झाल्याने कामगार परत आले नाही.  - प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव जिल्हा दाल मिल ओनर्स असोसिएशन

डाळ उद्योगात कामगार, मजुरांची कमतरता आहे. जीवनावश्‍यक वस्तूंमध्ये डाळींचा समावेश होत असला तरी मालवाहतूक नाही, मजूर नाही, कामगार नाही आणि कच्चा मालही नाही. मग अशा स्थितीत कुठल्या मालावर प्रक्रिया करणार, कुणाकडून करणार? जळगावकडून माल मुंबईला पाठविला, तर तिकडून मालवाहतूक गाड्यांना परतीची ट्रीप मिळत नाही. मालवाहतूक पूर्ववत सुरू झाली, तर डाळ मिल पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू करू शकतील.  - गोविंद मणियार, सदस्य, जळगाव जिल्हा दाल मिल ओनर्स असोसिएशन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com