खानदेशात मे महिनाअखेरीस कापूस बियाणे उपलब्ध होणार

या हंगामात पूर्वहंगामी कापूस लागवड पाणीटंचाईमुळे कमी होईल. परंतु हंगामी लागवड पाच टक्‍क्‍यांनी वाढू शकते. बीटी कापूस बियाण्याची अधिक पाकिटे या हंगामात उपलब्ध होतील. रेफ्युज व बीटी वाण मिश्रित ५२५ ग्रॅमचे एक पाकीट असेल. गुलाबी बोंड अळीला रोखण्यासाठी जूनमध्ये बियाणे जिल्हास्तरावर विक्रीसाठी वितरित होईल, अशी वरिष्ठांनी सूचना दिली आहे. - मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव
खानदेशात मे महिनाअखेरीस कापूस बियाणे उपलब्ध होणार
खानदेशात मे महिनाअखेरीस कापूस बियाणे उपलब्ध होणार

जळगाव  ः खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड कमी होईल, असे संकेत आहेत. याच वेळी कापूस लागवड जूनमध्ये व्हावी, गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र मोडीत निघावे यासाठी कापूस बियाणे मे महिन्याच्या अखेरीस खानदेशात उपलब्ध होईल. तशी सूचना राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी कृषी यंत्रणांसोबत मध्यंतरी झालेल्या व्हीसीमध्ये दिल्याची माहिती मिळाली आहे.  पूर्वहंगामी कापूस लागवडीसाठी खानदेशातील तापी, गिरणाकाठ प्रसिद्ध आहे. शिरपूर (जि. धुळे), शहादा, तळोदा (जि. नंदुरबार), चोपडा (जि. जळगाव) या तालुक्‍यांमध्ये काही वर्षांपूर्वी तर एप्रिल अखेरीस पूर्वहंगामी कापूस लागवड व्हायची. मागील तीन वर्षात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. तिचे जीवनचक्र मोडीत निघण्यासाठी कापसाखालील क्षेत्र किमान चार-पाच महिने रिकामे राहावे यासाठी कृषी विभाग व इतर यंत्रणा प्रयत्नशील आहेत. खानदेशातील कापसाखालील क्षेत्र जानेवारीतच रिकामे करण्याचे आवाहन या प्रयत्नातूनच करण्यात आले. याला काही शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला तर काहींनी प्रतिसाद दिला नाही. या हंगामात खानदेशात तापी व गिरणाकाठी पूर्वहंगामी कापसाची लागवड होईल. परंतु ती मागील हंगामाच्या तुलनेत कमी राहील. मागील हंगामात खानदेशात सुमारे पावणेदोन लाख हेक्‍टरवर पूर्वहंगामी कापूस लागवड झाली होती. या हंगामात ही लागवड दीड लाख हेक्‍टरपर्यंत असू शकते. कारण अनेक भागात पाणीटंचाई आहे. शेतकऱ्यांना पूर्वहंगामी कापसाखालील क्षेत्र कमी करण्याशिवाय पर्याय नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.  जूनमध्येच जिल्हा स्तरावर या बियाण्याचे वितरण होईल, अशी शक्‍यता आहे. खानदेशात सुमारे ४० लाख बीटी बियाणे पाकिटांची आवश्‍यकता आहे. जळगाव जिल्ह्यातून २५ लाख पाकिटांची मागणी करण्यात आली आहे. यात ३६ हजार पाकिटे देशी कापूस बियाण्याची मिळावीत, अशी अपेक्षा कृषी विभागाने वरिष्ठांकडे व्यक्त केली आहे. धुळे जिल्ह्यात आठ लाख तर नंदुरबारातही सुमारे १० लाख पाकिटांची आवश्‍यकता आहे.  रेफ्युज व बीटी कापूस वाण मिश्रित पाकिटे या हंगामात मिळतील. त्याचे वजन ५२५ ग्रॅम राहील. यात ७५ ग्रॅम बियाणे रेफ्युज वाणांची असतील. मागील हंगामात काही कंपन्यांनी रेफ्युज वाणांचे १२० ग्रॅमचे स्वतंत्र लहान पाकीट बीटी वाणांमध्ये दिले होते. परंतु या हंगामात बीटी व रेफ्युज वाण मिश्रित पाकिटे बाजारात उपलब्ध होतील, अशी माहिती मिळाली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com