सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरणीस प्रारंभ झाला आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक पेरा भाताचा झाला आहे. आतापर्यंत २६ हजार हेक्टरवर पेरा झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी पावसाची उघडीप आहे. त्यामुळे शेतकरी पावसाची प्रतीक्षा करू लागला आहे. जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र २ लाख ८१ हजार हेक्टर आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी करण्यासाठी पूर्व मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. आता पेरणीसाठीची कामे हाती घेतली आहेत. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकरी पेरणीसाठी नियोजन करू लागला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्यात केवळ ढगाळ वातावरण आहे. पावसाने उघडीप दिली आहे. त्यातच कुठेतरी हलका व मध्यम पाऊस पडत आहे. मात्र, हा पाऊस पेरणीसाठी उपयुक्त नसल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे देखील कृषी विभागाने शेतकऱ्यांना सांगितले आहे. शिराळा तालुक्यात भात पेरणीसाठी शेतीची कामे पूर्ण झाली असून, धूळ वाफेवर भाताची पेरणी मध्यावर आली आहे. तालुक्यात १७ हजार ४०० हेक्टर भाताचे सरासरी क्षेत्र आहे. त्यापैकी ११ हजार हेक्टरवर भाताची पेरणी झाली आहे. उर्वरित पेरणीसाठी शेतकरी नियोजन करू लागला आहे. या भागात भाताची उगवण देखील झाली आहे. कृष्णा आणि वारणा नदीच्या पट्ट्यात आगाप सोयाबीन पेरणीची परंपरा आहे. त्यामुळे आगाप सोयाबीन पेरणी झाली आहे. सर्वाधिक भाताची पेरणी तर सर्वात कमी ज्वारीची पेरणी झाली आहे.
पीकनिहाय पेरणी क्षेत्र
प्रतिक्रिया जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. पेरणी करताना उगवण क्षमता पहावी. शेतकऱ्यांनी पुरेशी ओल झाल्यानंतरच पेरणी करावी. बसवराज मास्तोळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.