दमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व भागात खरीप अडचणीत

यंदा खरिपात २२ एकरांवर मूग, बाजरी पेरण्याचे नियोजन केले होते. सुरवातीला पाऊस झाला नाही. जूनच्या शेवटी काही प्रमाणात पाऊस झाल्याने १० ते १२ एकरांवर पेरणी केली. उर्वरित क्षेत्र पावसाअभावी पडून राहिले आहे. आता पावसाची वाट पाहत असून, चांगला पाऊस झाल्यास खरीप कांद्याची लागवड करता येईल. - भाऊसाहेब पळसकर, शेतकरी, करडे, ता. शिरूर, जि. पुणे.
बाजरीचे पीक पावसाअभावी सुकू लागले आहे
बाजरीचे पीक पावसाअभावी सुकू लागले आहे

पुणे  ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर, इंदापूर, बारामती, दौंड, पुरंदर, खेड या तालुक्यांत अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. यामुळे खरीप हंगाम अडचणीत आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी अजूनही पेरण्या केलेल्या नाहीत. काही ठिकाणी पेरण्या झाल्या असल्या, तरी पावसाअभावी पिकांची उगवण झालेली नाही. परिणामी, खरीप हंगाम वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. 

पावसाळा सुरू होऊन दीड महिना संपला, तरी अनेक ठिकाणी अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात जून महिन्याची पावसाची सरासरी १४२.४ मिलिमीटर आहे. त्यापैकी १६८.५ मिलिमीटर म्हणजेच ११८.३ टक्के पाऊस झाला. जुलै महिन्याची पावसाची सरासरी २९५.४ मिलिमीटर आहे. त्यापैकी गेल्या १४ दिवसांत २१६.४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. हा पाऊस जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यांत झाला आहे. मात्र, पूर्वेकडील दौंड, शिरूर, खेड, इंदापूर, बारामती या तालुक्यांत ५० टक्केही पाऊस पडला नसल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र २ लाख ३० हजार ८३० हेक्टर असून, त्यापैकी ३३ हजार ४८३ हेक्टर म्हणजेच १४ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर, आंबेगाव हे तालुके भात उत्पादक तालुके म्हणून ओळखले जातात. या भागात १७ जूनपासून चांगला पाऊस पडत आहे. यामुळे भात लागवडीला चांगली सुरवात झाली आहे. सध्या या भागात भात व नाचणीची रोपे वाढीच्या अवस्थेत आहेत. या भागात चांगला पाऊस पडल्यामुळे सात हजार २९२ हेक्टरवर भाताची पुनर्लागवड झाली आहे. अजूनही या भागात अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत. त्यामुळे चालू आठवड्यात भात लागवडीला वेग येण्याची शक्यता आहे.  

जिल्ह्याच्या पूर्व भागातील तालुक्यांत जून महिन्यात काही प्रमाणात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी पंधरा दिवसांपूर्वी खरिपाच्या पेरण्यांना सुरवात केली होती. मात्र, त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. इंदापूरमध्ये तुरळक ठिकाणी बाजरी, तूर, मूग, मका, भुईमूग व सोयाबीनच्या अल्प प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत. येत्या काळात पुरेसा पाऊस न झाल्यास खरीप हंगाम वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.

शेतकरी प्रतिक्रिया

जून महिन्याच्या अखेरीस हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला होता. त्यामुळे मी दहा एकरांपैकी दोन एकरांवर बाजरीची पेरणी केली आहे. सध्या पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. आता पावसाची गरज असून, या आठवड्यात पाऊस न झाल्यास बाजरीचा पेरा वाया जाण्याची शक्यता आहे.  - सुनील राजेभोसले, शेतकरी, जोगवडी, ता. बारामती, जि. पुणे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com