राज्यात खरिपाचा ८५ टक्के पेरा : कृषी विभाग

राज्याच्या काही भागांत चांगला पाऊस आहे. मात्र, काही भागांतील कोरडवाहू क्षेत्रात तयार झालेल्या समस्या हाताळण्यासाठी कृषी विभाग आणि शास्त्रज्ञ एकत्रितपणे काम करीत आहेत. त्यासाठी आमच्या विद्यापीठाने ११२ तालुक्यांसाठी २२४ शास्त्रज्ञ उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आपत्कालीन स्थितीत पीकसल्ला देणारी यंत्रणा बळकट झालेली आहे. - डॉ. के. पी. विश्वनाथा, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
पेरणी
पेरणी

पुणे : राज्यात आत्तापर्यंत खरिपाचा ८५ टक्के पेरा झाला आहे. बहुतेक जिल्ह्यांमधील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या असून कापूस, सोयाबीन आणि मक्याचा पेरा यंदा सरासरीपेक्षाही पुढे गेला आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सांख्यिकी विभागातून देण्यात आली. राज्यातील खरिपात ऊस क्षेत्र वगळता १४० लाख हेक्टरपैकी आत्तापर्यंत ११८  लाख हेक्टरवर पेरा झालेला आहे. खरिपाच्या पहिल्याच टप्प्यात पावसाने दडी मारल्यामुळे कडधान्याचा पेरा घटल्याचा अंदाज यापूर्वी वर्तविला जात होता. मात्र, कृषी विभागाच्या आकडेवारीत मूग ७५ टक्के, तर उडदाचा पेरा ८४ टक्क्यांपर्यंत झाल्याचे दिसत आहे. भात, ज्वारी, नाचणीचा पेरा अद्याप ५० टक्क्यांच्या पुढे गेलेला नाही. “राज्यात यंदा चांगला पाऊस होत असून, पीकपेरादेखील समाधानकारक होत आहे. खरीप हंगामाचा पेरा पुढील काही दिवसांत संपुष्टात येईल,” असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. राज्याच्या काही भागांत कपाशीचा पेरा पिछाडीवर असल्याचे सांगितले जात असले तरी, सांखिकी विभागाच्या आकडेवारीत कपाशीचा पेरा १०० टक्के झालेला आहे. सध्या पेरा ४१ लाख हेक्टरच्या पुढे गेला आहे. सोयबीनचा पेरादेखील ३५ लाख हेक्टरपेक्षा जास्त झालेला आहे. राज्यातील तुरीचे सरासरी क्षेत्र बारा लाख ४७ हजार हेक्टर गृहीत धरण्यात आलेले आहे. सध्या पेरा १० लाख ८९ हजार हेक्टरपर्यंत म्हणजेच ८७ टक्क्यांपर्यंत गेल्याचा दावा कृषी खात्याने केला आहे.  दरम्यान, कोणत्या भागात कोणत्या पिकांवर कीड-रोगाचा प्रादुर्भाव आहे, पावसाची स्थिती कशी आहे याची विश्लेषणात्मक आकडेवारी कृषी विभागाने जाहीर केलेली नाही. त्यामुळे विभागनिहाय पिकांची अवस्थादेखील स्पष्ट झालेली नाही. गेल्या वर्षीची आकडेवारी गायब राज्यात १४० लाख हेक्टरवर खरीप पेरा होतो. टंचाई, पावसाचे चढ-उतार तसेच कीड-रोगांमुळे प्रत्येक आठवड्यातील घडामोडी महत्त्वाच्या ठरतात. शेतकरीदेखील गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू पेऱ्याची स्थिती काय आहे, हे पडताळून बघतात. मात्र, कृषी विभागाच्या वेबसाइटवरून गेल्या वर्षीची तुलनात्मक आकडेवारी गायब झालेली आहे. पेरण्यांची तुलना करताना आता गतवर्षीचे आकडे दिले जात नसून, सरासरी आकडे दिले जात आहेत. प्रतिक्रिया विदर्भात पाऊस उशिरा असल्याने धानाचा पेरा ४७ टक्क्यांच्या आसपास दिसतो आहे. मात्र, राज्यात एकूण पीकपेरा समाधानकारक असून १५ ऑगस्टपर्यंत पेरण्या संपुष्टात येतील.   - विजयकुमार घावटे, गुण नियंत्रण संचालक, कृषी आयुक्तालय कृषी सांख्यिकी विभागाने जाहीर केलेली ३० जुलैपर्यंतची पेरणी स्थिती

पीक   सरासरी क्षेत्र  प्रत्यक्ष पेरा  टक्के
भात  १५०८२२१ ६३६७८५ ४२
ज्वारी   ७१९३७७ २५२९३९  ३५
बाजरी  ८१०४६७ ४९५८६५   ६१
रागी  १०९००१   ४५५१७   ४२
मका  ७३६६६३ ७४९४७३  १०२
तूर १२४७४८७ १०८९७२५   ८७
मूग   ३९७४२४ २९७०४७  ७५
उडीद  ३१८८३७ २६७८०७   ८४
भुईमूग २३७०५६ १६५५०८ ७०
तीळ   ३०६७० १०१७० ३३
कारळे  २४६९८ ५८४३ २४
सूर्यफूल २७९६३ ८८८१ ३२
सोयबीन   ३५५३३३४ ३५९२१९५    १०१
कापूस ४१९११४४ ४१८१२८०  १००
  • सर्व आकडे हेक्टरमध्ये असून एकूण सरासरी क्षेत्र २०१२ ते २०१७ या दरम्यानचे आहे.
  • टक्केवारीचे आकडे सरासरी क्षेत्राच्या तुलनेत प्रत्यक्ष झालेल्या पेरणीचे आहेत.  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com