पुणे : विषाणूग्रस्त टोमॅटो प्रश्नी शेतकऱ्यांना अचूक व समाधानकारक निदान उपलब्ध करावे आणि पीक नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी किसान सभेने केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात निवेदन पाठविण्यात आले आहे. रोग निदानाबाबत प्राप्त झालेल्या केंद्रीय संस्थेच्या अहवालाबाबतही निवेदनात शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. तसेच सर्व नाशवंत पिकांना विमा योजना सुरू करावी अशी मागणीही केली आहे. राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन संस्था (आयआयएचआर) बंगरुळू या संस्थेला पाठविलेल्या नमुन्यांचे निष्कर्ष शेतकऱ्यांना प्राप्त झाले आहेत. यानुसार टोमॅटोवर चार मुख्य विषाणूंचा संसर्ग झाला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. फळ परिपक्व होण्याच्या काळात तापमान वाढल्यामुळे, खतांचा व पोषकांचा अति वापर झाल्याने टोमॅटो पिकाचे नुकसान झाल्याचे सूचित करण्यात आले आहे, मात्र याबाबत शेतकरी सहमत नाहीत. वरील विषाणूंचा संसर्ग टोमॅटो पिकात या पूर्वीही आढळलेला आहे. मात्र एकाच वेळी हा संसर्ग साथीच्या रोगा सारखा चार जिल्ह्यात पसरल्याची बाब वेगळी आहे. संसर्गाचे साथ सदृश परिस्थितीत रूपांतर कशामुळे झाले हे या पार्श्वभूमीवर शोधणे आवश्यक आहे. प्राप्त अहवालावरून या संसर्ग विस्ताराचे समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे किसान सभेने निवेदनात म्हटले आहे. संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नवीन पीक घेताना कोणते बियाणे वापरावे, काय प्रतिबंधात्मक उपाय करावे याचे मार्गदर्शनही शेतकऱ्यांना होण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांच्या वरील शंकाही दूर होणे आवश्यक आहे. सरकारने या दृष्टीने पावले उचलावीत अशी मागणी किसान सभेचे डॉ. अशोक ढवळे, जे.पी. गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, डॉ.अजित नवले यांनी निवेदनात केली आहे. किसान सभेने उपस्थित केलेले प्रश्न
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.