मुंबईकडे झेपावणार `लाल वादळ’ 

दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा पाठिंबा व्यापक करण्यासाठी राज्यात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने राज्यव्यापी नाशिक ते मुंबई वाहन मार्च आज (ता. २३) निघणार आहे.
मुंबईकडे झेपावणार `लाल वादळ’ 
मुंबईकडे झेपावणार `लाल वादळ’ 

नाशिक : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा पाठिंबा व्यापक करण्यासाठी राज्यात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने राज्यव्यापी नाशिक ते मुंबई वाहन मार्च आज (ता. २३) निघणार आहे. त्यात राज्यातील २१ जिल्ह्यांतून २० हजारांहून शेतकरी सहभागी होतील, अशी माहिती अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी दिली. 

राज्यव्यापी वाहन मार्चबद्दल माहिती देण्यासाठी शुक्रवार (ता. २२) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी राज्य अध्यक्ष किसन गुजर, राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, सहसचिव सुनील मालुसरे उपस्थित होते. हा वाहन मार्च नाशिक येथून आज (ता. २३) दुपारी मुंबईकडे कूच करणार आहे. घाटनदेवी येथे रात्री मुक्कामी असेल. रविवारी (ता. २४) कसारा घाट उतरून मुंबईच्या दिशेने निघणार आहे. 

दिल्लीतील शेतकरी आंदोलन तीव्र करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने देशभर २३ ते २६ जानेवारी या काळात सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये राज्यपाल भवनावर आंदोलन करण्याची हाक दिली असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. मुंबई येथील आझाद मैदान होणाऱ्या महामुक्काम आंदोलनात हा वाहन मार्च रविवारी (ता. २४) सामील होणार आहे. 

राज्यभरातील १००पेक्षा अधिक संघटनांच्या वतीने संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या झेंड्याखाली मुंबईतील हे महामुक्काम आंदोलन होणार आहे. राज्यातील अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, जन आंदोलनांची संघर्ष समिती, नेशन फॉर फार्मर्स आणि हम भारत के लोग या पाच मंचांनी मिळून संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा काढला आहे. 

सोमवारी (ता. २५) आझाद मैदान येथे सकाळी ११ वाजता सभा होणार आहे. यामध्ये महाविकास आघाडीतील सर्व पक्ष, डावे व लोकशाही पक्ष यांच्या प्रमुख नेत्यांसोबत अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस माजी खासदार हनन मोल्ला या सभेस संबोधित करणार आहेत. सभेनंतर येथे जमलेले हजारो आंदोलक दुपारी २ वाजता राजभवनाकडे कूच करून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यपालांना मागण्यांचे निवेदन सादर करतील. 

मंगळवारी (ता. २६) प्रजासत्ताकदिनी सकाळी मुंबईच्या आझाद मैदानावर राष्ट्रध्वज फडकवून, राष्ट्रगीत गायन होऊन शेतकरी-कामगारांचे हे आंदोलन विजयी करण्याचा निर्धार करून या महामुक्कामाची सांगता होणार असल्याची माहिती डॉ. ढवळे यांनी दिली. राज्यातील हजारो शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिला, युवक व विद्यार्थ्यांना घेऊन या मार्चमध्ये सामील होणार आहेत.  राज्यपालांकडे या मागण्या मांडणार 

  • शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द करा. 
  • शेतीमालाला आधार भावाचे संरक्षण देणारा कायदा करा. 
  • वीज विधेयक मागे घ्या. 
  • कामगार संहितेमधील कामगार विरोधी बदल रद्द करा. 
  • वनजमीन तथा देवस्थान, गायरान, आकारीपड, बेनामी व वरकस जमीन कसणारांच्या नावे करा. 
  • महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरू करून सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्या. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com