किसान सभेचा पुन्हा नाशिक ते मुंबई लॉँग मार्च

किसान सभेचा पुन्हा नाशिक ते मुंबई लॉँग मार्च
किसान सभेचा पुन्हा नाशिक ते मुंबई लॉँग मार्च

 नगर : केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या केलेल्या विश्वासघातविरोधात पुन्हा नाशिक ते मुंबई भव्य लॉँग मार्च काढण्याचा निर्णय किसान सभेने जाहीर केला आहे. नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय किसान सभेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  २० फेब्रुवारीला नाशिक येथील मुंबई नाका येथून लॉँग मार्चला सुरवात होणार आहे. आठ दिवस पायी चालून हा लॉंग मार्च २७ फेब्रुवारी रोजी मुंबईत धडकणार आहे. मागील लॉँग मार्चपेक्षा या लॉँग मार्चमध्ये दुप्पट शेतकरी सामील होणार आहेत. राज्यभरातील २३ जिल्ह्यांमधून शेतकरी सहभागी होणार असल्याने खऱ्या अर्थाने हा राज्यव्यापी लॉँग मार्च असणार आहे, असे किसान सभेचे नेते डाॅ. अजित नवले यांनी सांगितले.  किसान सभेच्या वतीने वर्षभरापूर्वी नाशिक ते मुंबई भव्य पायी लॉँग मार्च काढण्यात आला होता. शेतकरी कर्जमुक्ती, दीडपट हमीभाव, कसत असलेल्या जमिनींची मालकी, बुलेट ट्रेनला विरोध, पाणी, शेतकरी पेंशन या मागण्या लॉँग मार्चाने राज्य सरकारकडे केलेल्या होत्या. लॉँग मार्चमध्ये ४० हजार शेतकरी पायी चालत मुंबईला पोचल्यावर जागे झालेल्या राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या या मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र लॉँग मार्चला एक वर्ष पूर्ण होत असताना अद्याप मान्य केलेल्या अनेक मागण्यांची राज्य सरकारने अंमलबजावणी केलेली नाही. शेतकऱ्यांमध्ये यामुळे मोठा असंतोष खदखदतो आहे. अखिल भारतीय स्तरावर २०८ संघटनांनी एकत्र येत शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी दिल्ली येथे ऐतिहासिक किसान मार्चचे आयोजन केले होते. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीमालाला रास्त उत्पादन खर्चावर दीडपट हमीभाव व शेतीसाठी सर्वंकष पर्यायी शेती धोरण या प्रमुख मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या या किसान मार्चमध्ये देशभरातून लाखो शेतकरी सहभागी झाले होते.  केंद्र सरकार या किसान मार्चची  दखल घेऊन नव्या अर्थसंकल्पात या मागण्यांच्या पूर्ततेसाठी तरतूद करेल अशी आशा होती. मात्र अंतरिम अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी एक फेब्रुवारी रोजी मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात या मागण्यांनाही वाटाण्याच्या अक्षदा लावण्यात आल्या आहेत. कर्जमाफी व दीडपट हमीभावाऐवजी प्रतिदिन ३ रुपये २८ पैसे जीवन जगण्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची घोषणा केवळ करण्यात आली आहे. मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा संतापजनक प्रकार आहे. देशभरातील शेतकऱ्यांमध्ये यामुळे मोठे असंतोषाचे वातावरण पसरले आहे. अशा पार्श्वभूमीवर किसान सभेच्या वतीने हा लॉँग मार्च काढण्यात येत आहे, असे किसान सभेचे नेते डॉ. अशोक ढवळे, आमदार जे. पी. गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, डॉ. अजित नवले यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com