वरवंड, जि. पुणे ः सरकारच्या धोरणामुळे शेती व्यवस्था धोक्यात आली आहे. खासगी कंपन्यांना शेती करायला देऊन शेतकऱ्याला कामाला ठेवण्याचा सरकारचा डाव आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास १८ नोव्हेंबरपासून राज्यातील गावोगावी बंद व उपोषण करून आंदोलन करणार अाहे, अशी घोषणा राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेश अध्यक्ष शंकरअण्णा धोंडगे यांनी केली.
कानगाव (ता. दौंड) येथील शेतकरी आक्रोश आंदोलनाला श्री. धोंडगे यांनी बुधवारी (ता. १५) भेट देऊन पाठिंबा दिला. त्यावेळी ते बोलत होते. संपूर्ण कर्जमाफी व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कानगाव येथील शेतकऱ्यांनी दोन नोब्हेंबरपासून वेगवेळ्या मार्गाने शेतकरी आक्रोश आंदोलन सुरू ठेवले आहे.
पुणे व इतर जिल्ह्यातील सव्वासे गावांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शिवाय अनेक राजकीय नेत्यांनी आंदोलनाला भेट दिली आहे. यामध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, आमदार राहुल कुल, शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने आदींचा समावेश आहे.
आंदोलकांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंडन, पुतळा दहन, बोंबाबोंब, अर्धनग्न, अर्ध जलसमाधी आदी प्रकारे आंदोलनाची धग कायम ठेवली अाहे.